‘रांझना’, ‘वीरे दे वेडिंग’, ‘तनु वेड्स मनु’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री स्वरा भास्कर आज लाखो तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. परिणामी स्वराच्या अभिनयाचीच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्याची देखील सर्वत्र चर्चा असते. स्वरा सध्या हिंमाशू शर्मासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अलिकडेच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

का झालं स्वराचा ब्रेकअप?

२०१३ साली ‘रांझणा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान स्वरा हिंमाशूच्या प्रेमात पडली होती. हिंमाशूनेच ‘रांझणा’ची पटकथा लिहिली होती. स्वरा म्हणते, “सुरुवातीचे दिवस फार छान होते. मात्र हळूहळू आमच्यात मतभेद होऊ लागले. दोघांचीही विचार करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे हे मतभेद होत असावेत. परंतु यामुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. हे नातं आम्ही जवळपास सात वर्ष टिकवलं. मात्र एके दिवशी आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअप नंतरही आमच्यात मैत्रीचं नात कायम आहे.” असं स्वरा या मुलाखतीत म्हणाली.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मते मांडताना दिसते. दरम्यान अनेकदा तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वराच्या वैयक्तिक आयुष्यावरही चाहते मोठ्या प्रमाणावर चर्चा करताना दिसतात.