गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबतच प्रेक्षकांसाठीही हा भावूक क्षण आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे त्यांच्या मतदारसंघात असताना एका चिमुरडीने रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून त्यांना घरी येण्याचा आग्रह केला. हे पाहून तेसुद्धा नि:शब्द झाले. फेसबुक पोस्टद्वारे अमोल कोल्हे यांनी हा प्रसंग सांगितला. 'आज मतदारसंघात एक चिमुरडी भेटली. रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून सांगत होती आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला.. नाहीतर ते तुम्हाला पकडतील. मी नि:शब्द. कृतकृत्य!' डॉ. अमोल कोल्हेंसाठी या मालिकेचा प्रवास काळजाच्या कप्प्यात जपून ठेवण्याजोगा आहे. फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.