आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी तापसी पन्नू हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. चौकटी बाहेरच्या भूमिका साकारत तापसीने हळहळू जम बसवला. मात्र या प्रवासात तिलासुद्धा घराणेशाहीला सामोरं जावं लागलं होतं. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तापसीने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर तिची मतं मांडली.

“तुम्ही स्टार किड असाल किंवा तुम्हाला फिल्मी बॅकग्राऊंड असेल तर इंडस्ट्रीत तुम्हाला फार स्ट्रगल करावं लागत नाही. याउलट बाहेरुन आलेल्यांना फार मेहनत घ्यावी लागते, ओळख बनवावे लागतात. अनेकदा दिग्दर्शक त्यांच्या ओळखीच्या कलाकारांनाच काम देऊ इच्छितात. अशा वेळी बाहेरून आलेल्यांना संधी मिळत नाही,” असं ती म्हणाली.

आणखी वाचा : मी देखील घराणेशाहीचा शिकार – सैफ अली खान

याविषयी ती पुढे म्हणाली, “बाहेरुन आलेल्या प्रत्येक कलाकाराने हे समजून घ्यावं की थोडा वेळ लागेल, पण तुमच्याकडे प्रतिभा असली, कौशल्य असलं की तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यावेळी मिळालेलं यश हे फक्त तुमचंच असेल. त्यावर कोणाचाच अधिकार नसेल. प्रेक्षकांनाही स्टार किड्सपेक्षा बाहेरुन आलेले कलाकार आवडतात.” घराणेशाहीमुळे अनेक चित्रपट गमावल्याचा खुलासा तापसीने या मुलाखतीत केला.

तापसी सध्या बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री असून सध्या तिच्या हातात अनेक चित्रपटांचे ऑफर्स आहेत. ‘रश्मी रॉकेट’, ‘शाबाश मिठ्ठू’, ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘लूप लपेटा’ असे काही तिचे चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.