कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील सर्वात चर्चेत असलेली ‘बबीता’ म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याच्या अफवांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं. त्यावर आता अखेर बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ताने आपलं मौन सोडलंय. तसंच गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत गायब झाल्याचं कारण ही तिने सांगितलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमध्ये दिसत नाही. या शोमधून अचानक बबीताजी गायब झाल्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. अभिनेत्री मुनमुन दत्ता ही गेल्या अनेक दिवसांपासून शो च्या शूटिंग सेटवर येत नसल्याचं बोललं जातंय. एक महिन्यापूर्वीच शोमधली सगळी टीम दमणमधलं शूटिंग आटोपून परतलीय. सध्या या शो चं शूटिंग मुंबईत सुरूय. मुंबईत आल्यापासून या शोसाठी अभिनेत्री मुनमुन दत्तासाठीची कोणती स्किप्ट सुद्धा लिहिली जात नसल्याचं बोललं जातंय. हे सर्व चित्र पाहून बबीताजीने ही मालिका सोडली असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्यावर आता बबीताने पुढे येत स्पष्टीकरण दिलंय.

यावेळी बोलताना अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणाली, “सध्या या शोमध्ये माझी गरज नाही. गेल्या दोन तीन दिवसांपासून मी मालिका सोडल्याबाबतच्या अफवा पसरत आहेत. याचा माझ्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतोय. मी सेटवर हजेरी लावत नाही, हे खरं नाही. सध्या या शोमध्ये माझ्या उपस्थितीची गरज नाही. त्यामूळे मी सेटवर येत नाही.”

अभिनेत्री मुनमुन दत्ताने पुढे येत मालिका सोडल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगितलं. त्यानंतर शो च्या मेकर्सनी सुद्धा पुढे येत चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय. गेल्या महिन्यात अभिनेत्री मुनमुन दत्ता एका व्हिडीओमुळे वादात अडकली होती. या प्रकरणात तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. इतकंच काय तर या प्रकरणामुळे तिच्यावर पोलिस कोठडीत सुद्धा जाण्याची वेळ आली होती. त्यानंतर मुनमुन दत्ताने तो व्हिडिओ काढून टाकला होता. तसंच तिच्या चुकीबद्दल क्षमा मागितली होती. या प्रकरणामुळे मुनमुन दत्ताला मानसिक त्रास झाला आणि ती पूर्णपणे खचून गेली होती. तिने माफी मागितल्यानंतर सुद्धा हे प्रकरण थंड झाले नाही.

या प्रकरणामुळे मालिकेला कोणताही नुकसान होऊ नये म्हणून शो च्या मेकर्सनी अभिनेत्री मुनमुन दत्तासाठी कोणतीही स्किप्ट न लिहिण्याचा निर्णय घेतलाय. तसंच या प्रकरणातून धडा घेत मेकर्सनी आता या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांकडून अंडरटेकिंग साईन करुन घेण्याचा निर्णय घेतलाय. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी त्यांनी मार्ग काढला आहे. त्यामुळे या मालिकेत काही दिवस तरी बबीताजींचं दर्शन घडणार नाही.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा शो’ हा शो नेहमीच टीआरपीमध्ये नंबर १ मध्ये असतो. या मालिकेतले निखळ विनोद प्रेक्षकांना खूप आवडू लागले आहेत. पण आता काही दिवस काही जेठालाल आणि बबीताजी यांच्यातले विनोद पाहता येणार नसल्याने फॅन्सची निराशा झालीय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah after babita ji casteist controversy now the show producer took this big decision prp
First published on: 25-07-2021 at 22:36 IST