गेल्या १२ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, चंपकलाल चाचा, टप्पू आणि दया बेन यांची लोकप्रियता तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. २०१७ मध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने मालिका सोडली. त्यानंतर निर्मात्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, दया बेन परत आली नाही. दिशा वकानीची एक मुलाखत आता व्हायरल होत आहे. यात दिशाने तिच्या पहिल्या पगारा विषयी सांगितले आहे.

“माझ्या पहिल्या नाटकासाठी मला २५० रुपये मिळाले होते. मला आठवते की मी ती रक्कम माझ्या वडिलांकडे दिली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते; तो क्षण मी कधीच विसरणार नाही, तो नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील. एक कलाकार म्हणून, आर्थिक समाधानापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे असते”, असे दिशा एका मुलाखतीत म्हणाल्याचे वृत्त ‘कोईमोई’ वृत्तवाहिनीने दिले आहे.

एवढ्या वर्षांपासून आपले मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील कोणतीही भूमिका बदलली तरी त्याचा परिणाम हा प्रेक्षकांवर होतो. आता काही दिवसांपूर्वी दिशा वकानी शोमध्ये पुन्हा येणार नाही ही बातमी ऐकून प्रेक्षकांना धक्का बसला आहे. मात्र, तरीही अनेक प्रेक्षक दया बेन पुन्हा कधीतरी मालिकेत येईल ही आशा धरून बसले आहेत.