बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत ही प्रेक्षकांच्या हृदयावर सध्या राज्य करत आहे. तिचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं बक्कळ कमाई केली. ‘मणिकर्णिका’च्या यशासाठी अनेक चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र जेव्हा ‘मणिकर्णिका’ वादात सापडला होता त्यावेळी बॉलिवूडमधला एकही कलाकार तिच्या समर्थनार्थ पुढे आला नाही असा आरोप कंगनानं केला आहे. बॉलिवूडमधले इतर कलाकार जरी कंगनाच्या समर्थनार्थ पुढे आले नसले तरी अभिनेत्री तनुश्री दत्ता मात्र तिच्यासाठी पुढे आली आहे.

बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या गटबाजी, घराणेशाहीवर आवाज उठवल्याबद्दल तनुश्रीनं पत्र लिहून कंगनाचं कौतुक केलं आहे. कंगना हिच खरी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिनं स्वत:च्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान मिळवलं आहे. बॉलिवूडमधल्या मोठ्या स्टार्सचा वापर स्वत:च्या प्रसिद्धीसाठी न करता तिनं मेहनतीनं स्वत:चं राज्य प्रस्थापित केलं आहे. ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे म्हणूनच बॉलिवूडमधले अनेक लोक तिच द्वेष करतात.’ असं तनुश्रीनं कंगनाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कंगनानं एकटीनं सारं यश मिळवलं, म्हणूनच काहींच्या पोटात दुखतं. तिचं यश बॉलिवूडमधल्या काही लोकांना सहन होत नाही. हे देखील तनुश्रीनं पत्रात लिहिलं आहे. या पत्रातून तनुश्रीनं कंगनाला आपला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. तनुश्री ही बऱ्याच वर्षानंतर भारतात परतली. तनुश्रीला बॉलिवूडमध्ये मीटु मोहिम सुरु करण्याचं श्रेय दिलं जातं.