मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वैविध्यपूर्ण विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मुख्य म्हणजे विविध विषयासोबतच सिनेमांच्या आशयामध्येही विविधता दिसून येत आहे. समाजात आजही जात, रूढी, परंपरा, यांची मुळं खोलवर रुजलेली दिसतात. एकीकडे ‘जात’ या संकल्पनेचे समूळ उच्चाटन करण्याचे भाष्य करत असताना जातीपातीचे राजकारण खेळणारी सुशिक्षित माणसं सभोवताली वावरताना दिसतात. याच विचारधारेवर प्रकाश टाकणारा ‘ताटवा’ हा नवा मराठी सिनेमा येत्या २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शरयू आर्ट प्रॉडक्शन’ निर्मित ‘ताटवा’ या सिनेमाचं दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केलं आहे.

‘प्रेम’ आणि ‘कला’ या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांना जातीचं बंधन कधीच अडवू शकत नाही. प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमाची कथा गुंफली आहे. या सिनेमाची कथा शिल्पा या ‘पाथरवट’ समाजातील मुलीच्या जीवनावर बेतलेली आहे. दगडाचे पाटे, वरवंटे, खेळणी विकून शिल्पाचे कुटुंब उदरनिर्वाह करत असते. एका अनपेक्षित क्षणी लिखितचा तिच्या आयुष्यात प्रवेश होतो. त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी कोणत्या वळणावर येऊन थांबते, जातीवादाचे चटके सोसून शिल्पा येणाऱ्या समस्यांवर कशी मात करते, याचं चित्रण ‘ताटवा’मध्ये करण्यात आलं आहे.

संजय शेजवळ आणि गौरी कोंगे ही नवी जोडी ‘ताटवा’ चित्रपटातून पदार्पण करत आहे. सोबत अरुण नलावडे, शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत. नाट्यलेखक व चित्रकार सदानंद बोरकर यांनी चित्रपटाचे कला दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे. श्रीपाद भोळे लिखित या चित्रपटातील गीतांना संगीतकार अतुल जोशी, प्रशांत फासगे यांनी संगीत दिले असून गायक केवल वाळंज, सावनी रवींद्र, योगिता गोडबोले, अतुल जोशी, प्रसाद शुक्ल यांनी ती गायली आहेत.