प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विविध मालिकांचा घाट घातला जातोय. तर काही मालिकांचं कथानक उगाचच ताणलं जातंय. अशा परिस्थितीच टेलिव्हिजन विश्वात आणखी एका विषयाच्या चर्चा रंगल्या आहेत. तो विषय म्हणजे सोनी वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका, 'पहरेदार पिया की'. ९ वर्षांच्या मुलासोबत अठरा वर्षांच्या मुलीचं लग्न दाखवल्यामुळे आधीपासूनच ही मालिका चर्चेचा विषय ठरली होती. अनेकांनी सोशल मीडियावरुन या मालिकेवर निशाणाही साधला. आता या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अफान खान या बालकलाकाराच्या वडिलांनीच त्याच्या भूमिकेविषयी आणि एकंदर मालिकेविषयी आपलं मत मांडलं आहे. 'पहरेदार पिया की'च्या कथानकावरुन सुरु असणाऱ्या वादाविषयी विचारलं असता 'स्पॉटबॉय' या वेबसाइटशी संवाद साधताना अफानचे वडील म्हणाले, 'मालिकेची स्क्रीप्ट आम्ही नीट वाचली आहे. कोणत्याही गोष्टीला, रुढीला उत्तेजन देण्यासाठी ही मालिका प्रसारित केली जात नाहीये. त्यातही मी तुम्हाला सांगू इच्छितो की, या मालिकेचं कथानक लवकरच एक रंजक वळण घेणार आहे. हा फक्त एक कार्यक्रम आहे आणि माझा मुलगा अफान त्यात फक्त एक भूमिका साकारतोय. किंबहुना अनेकांनी त्याच्या भूमिकेची प्रशंसा करत तो खूपच सुरेख दिसत असल्याचंही म्हटलं आहे.' वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती गेल्या बऱ्याच दिवसांपासून 'पहरेदार.' विषयीच्या काही चर्चा रंगल्यामुळे या मालिकेला एका वेगळ्यात मार्गाने प्रसिद्धी मिळाल्याचंही पाहायला मिळालं. त्यातच आता अफानच्या वडिलांनी मालिकेविषयी त्यांचं मत मांडल्यामुळे या चर्चांना वेगळं वळण मिळालं आहे. 'आम्ही हे सर्व पैशांसाठी करत नाहीये. अफान फक्त त्याला देण्यात आलेली भूमिका साकारतोय. स्क्रीनवर कोणी खलनायकाची भूमिका साकारली तर खऱ्या आयुष्यात तो किंवा ती खलनायक ठरतात का', असा प्रश्न उपस्थित करत अफानच्या वडिलांनी सर्वांचं लक्ष वेधलं. सलमान आणि शाहरुखची नावंही बऱ्याच वादांमध्ये समोर आली आहेत. पण, फक्त यामुळेच त्यांनी अभिनय करणं सोडलं नाहीये ना, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, 'पहरेदार पिया की'च्या पुढील काही भागांमध्ये 'रतन' (अफान खान) आणि 'दिया' (तेजस्वी प्रकाश) यांचा हनिमून दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावरुनच फक्त टीआरपीसाठी असं विषय भरकटलेलं कथानक दाखवण्यात येणार असल्याचं मत सोशल मीडियावर अनेकांनी मांडलं आहे.