काळवीट शिकारप्रकरणी पुढील सुनावणीच्यावेळी जर कोर्टात हजेरी लावली नाही तर जामीन रद्द करण्यात येईल, अशा कडक शब्दांत बॉलिवूड कलाकार सलमान खान याला जोधपूरच्या कोर्टाने खडसावले आहे. आज या खटल्याची सुनावणी होती मात्र, सलमानने कोर्टात हजेरी लावली नाही. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी आता २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

वीस वर्षांपूर्वी १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सलमान खान आणि त्याचे सहकलाकार सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्यावर जोधपूरमधील कांकाणी गावात एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

गेल्या वर्षी ५ एप्रिलला जोधपूर सेशन कोर्टाचे मुख्य न्यायाधीश देवकुमार खत्री यांनी सुमारे दोन दशकं जुन्या काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दोषी ठरवताना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर सलमानवर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. तर इतर आरोपी सैफ अली खान, नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि दुष्यंत सिंह यांना निर्देश मुक्त केले होते.

त्यानंतर सलमान खानने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा आणि सेशन कोर्टात अपील केली होती. ७ एप्रिलला जिल्हा आणि सेशन कोर्टाने सलमानविरोधात सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.