आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दिक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित ‘कलंक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील कलाकारांनी मिळून त्याचं जोरदार प्रमोशन केलं होतं. पण या प्रमोशनमध्ये एक व्यक्ती कुठेच दिसली नाही. ती व्यक्ती म्हणजे अभिनेता संजय दत्त.

संजय दत्तला ‘कलंक’च्या प्रमोशनपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे. यामागचं कारण म्हणजे दिग्दर्शक राजकुमार हिरानी. ‘कलंक’च्या प्रमोशनमध्ये संजयची अनुपस्थिती आणि राजकुमार हिरानी यांचा कनेक्शन असल्याचं वृत्त ‘द एशियन एज’ने दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘#मीटू’ मोहिमेअंतर्गत राजकुमार यांच्यावर एका महिलेने गैरवर्तनाचे आरोप केले होते. यावर संजय दत्तने हिरानींची पाठराखण करत त्यांच्यावरील आरोपांवर मला मुळीच विश्वास नाही, असं तो म्हणाला होता. हिरानींची बाजू घेणं संजयला खूप महागात पडलं. यानंतर संजय प्रचंड ट्रोल झाला होता. सोशल मीडियावर संजय दत्तवर होणारी टीका पाहून ‘कलंक’च्या निर्मात्यांनी त्याला प्रमोशनपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. तर काहींच्या मते, माधुरी दीक्षितमुळे संजयला प्रमोशनपासून लांब ठेवण्यात आलं.

तर संजय दत्तनेही प्रमोशनपासून लांब राहण्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मुख्य प्रमोशनल कार्यक्रम सोडून मी कुठल्याही प्रमोशनमध्ये सहभागी होणार नाही असं मी चित्रपटासाठी होकार देतानाच सांगितलं होतं. तशी अटच मी निर्मात्यांसमोर ठेवली होती. माझी या चित्रपटात सहाय्यक भूमिका आहे, मुख्य नाही. त्यामुळे माझ्या नसण्याने चित्रपटाच्या प्रमोशनवर कुठलाही परिणाम होणार नव्हता,’ असं तो म्हणाला होता.