बॉलिवूडमध्ये कलाकार आणि त्यांच्यामध्ये असणारे मैत्रिचे नाते, काही धम्माल किस्से याबद्दल नेहमीच प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळते. बी टाऊनमधील अशीच एक धम्माल जोडी म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अजय देवगण यांची. अभिनेता सलमान खान आणि अजय देवगण यांच्यामध्ये चांगलीच मैत्री आहे हे आपण सारेच जाणतो. पण, येत्या काळामध्ये या कलाकारांच्या मैत्रीतही दुरावा येऊ शकतो असे म्हटले जात आहे.

अजय देवगण सध्या त्याच्या ‘सन्स ऑफ सरदार- द बॅटल ऑफ सारागढी’ या चित्रपटावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. अजयचा हा बिग बजेट चित्रपट १८९७ साली लढल्या गेलेल्या सारागढीच्या लढाईवर आधारित आहे. २१ शीख सैनिक आणि १०,००० अफगाणी सैनिकांमध्ये लढल्या गेलेल्या लढाईचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात येणार आहे.

पिंकव्हिला या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षी अजयने या चित्रपटाबद्दलच त्याची भूमिका स्पष्ट केली होती. ‘हा चित्रपट एका मोठ्या पातळीवर सर्वांसमोर आला पाहिजे. त्यामुळे या चित्रपटासंबंधीची सर्व माहिती मिळविण्यासाठी फार मेहनत घेतली जात आहे. माझ्यासाठी ‘सन्स ऑफ सरदार…’ हा फक्त एक चित्रपट नसून ती एक भावनात्मक गोष्ट आहे.’, असे अजय म्हणाला होता. या चित्रपटासाठी प्रचंड उत्साहात असताना अजयला एका गोष्टीने चांगलाच धक्का बसला ज्यावेळी सलमान खान आणि करण जोहर यांनी सारागढीच्याच लढाईवर आधारित चित्रपटाची घोषणा केली. सध्या अशा चर्चा रंगत आहेत की सारागढीच्या लढाईवर आधारित चित्रपटाच्या निर्मितीसाठी सलमान खानही पुढे सरसावला आहे.

एका दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तनुसार अजयला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. त्याने सलमानच्या कुटुंबालाही विचारात घेतले. त्यानंतर त्याने सलमानला एक भावनिक मॅसेज पाठवला ज्यामध्ये त्याने सलमान आपल्याला अशा प्रकारे दुखावू शकेल असे कधीही वाटले नसल्याचे म्हटले होते. अजय सलमानला म्हणाला होता, ‘मागील दोन वर्षांपासून ज्या चित्रपटासाठी माझी टीम, आम्ही सारेच काम करत आहोत त्याच विषयावर आधारित चित्रपट बनविणे योग्य नाहीये’. अजयच्या या मॅसेजविषयी बोलताना सलमानच्या एका निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार ‘सलमानचं म्हणायचं झालं तर त्याला अजयच्या चित्रपटाबद्दल काहीही ठाऊक नव्हते. तो आपल्या मित्राला दुखावण्यासाठी असे काहीही करणार नाही’, असे वृत्तही एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. या प्रकरणी सलमान आणि अजयने उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे आता या प्रकरणाला कोणते वळण मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

वाचा: करण- काजोलच्या वादात आता अजय देवगणही

दरम्यान, सध्या सलमान त्याच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, भारत आणि चीन दरम्यान १९६२ मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. या चित्रपटात एका सुरेख प्रेमकहाणीचे चित्रण करण्यात आले आहे. सलमानच्या इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटातील त्याची भूमिका फार वेगळी असणार असल्याची माहिती मिळाली आहे.