अभिनेता सलमान खान याने अद्याप लग्न केलेले नाही. त्याच्या लग्नाची चर्चा सुरू होऊन आता बंद देखील झाली तरीही त्याच्या लग्नाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. लग्नासाठीचं योग्य वय काय याचा खुलासा खुद्द सलमान खाननेच केला आहे. ७२ हे लग्नाचं योग्य वय आहे असं सलमान खानने म्हटलं आहे. सलमान खानचा भारत हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या सिनेमाने १५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानला हा प्रश्न विचारण्यात आला की तुझ्या लग्नाची चर्चा सुरू होऊन बंदही झाली. त्यावर उत्तर देताना सलमानने लग्नासाठीचं योग्य वय ७२ असल्याचं म्हटलं आहे.

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर ही सलमान खानची ख्याती आहे. मैनै प्यार किया या सिनेमापासून आत्ताच्या भारतपर्यंत आलेल्या सिनेमांचा विचार केला तर त्याची कारकीर्द बरीच मोठी आहे. एवढंच नाही तर त्याच्या गर्लफ्रेंड्सची यादीही बरीच मोठी आहे. तरीही सलमानने लग्न केलेले नाही. भारत सिनेमात सलमान खानने ७० वर्षांच्या वृद्धाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या भूमिकेबाबत बोलतानाच सलमानने लग्नासाठीचं योग्य वय ७२ असल्याचं उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच लग्नसंस्थेवर आपला मुळीच विश्वास नाही असं म्हटलं होतं. लग्नसंस्था हळूहळू लुप्त होत जाणार आहे. सहचर्यावर माझा विश्वास आहे असं सलमान खानने म्हटलं होतं. दरम्यान टीव्हीमुळे आपल्याला लोक ओळखू लागले असे सलमान खानने म्हटले आहे. ‘दस का दम’ आणि ‘बिग बॉस’ या शोमधून मी जसा आहे तसा दिसतो, तसा लोकांपर्यंत पोहचलो असं सलमान खानने म्हटलं आहे. तसेच नच बलिए या शोची निर्मिती आपण करणार आहोत असे सलमान खानने म्हटले आहे. कपल आणि एक्स कपल अशी नव्या मोसमाची थीम असणार आहे असंही सलमान खानने स्पष्ट केले.