गडहिंग्लजमधील बंद व्यायामशाळा नव्याने सुरू; राणासाठी ‘झेड प्लस’ सुरक्षा रसिकांचा मालिकांमध्ये जीव गुंततोच. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणाच्या प्रेमात सध्या कोल्हापूरकर पडले आहेत. राणाचा तरुणाईवर इतका प्रभाव पडला आहे की गडहिंग्लज तालुक्यातील गेली १५ वर्षे बंद पडलेल्या व्यायामशाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील राणा आणि अंजलीची प्रेमकथा सांगणारी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका कोल्हापूरच्या अस्सल मातीतली आहे. मालिकेचे चित्रीकरणही कोल्हापूरमध्येच करण्यात येत असल्याने तिथे एक नवे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा खासा अनुभव राणाची भूमिका करणारा अभिनेता हार्दिक जोशी आणि मालिकेच्या टीमला येतो आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सध्या ‘बार्क’च्या आकडेवारीनुसार पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेचा नायक राणा हा शेतात राबणारा, अशिक्षित, सतत व्यायाम करणारा साधाभोळा तरुण आहे. पैलवान असलेल्या राणाची पिळदार शरीरयष्टी आजूबाजूच्या तरुणांसाठी आकर्षणाचा विषय ठरली असून त्याच्याप्रमाणे शरीर कमवावे यासाठी तरुणांनी व्यायामशाळांमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर म्हणजे कुस्तीचा आखाडा हे समीकरण असले तरी गडहिंग्लजमध्ये गेली अनेक वर्षे काही जिम, व्यायामशाळा बंद पडल्या होत्या. त्या सगळ्या एकत्रितरीत्या पुन्हा सुरू झाल्या असून रोजच्या रोज इथे गर्दी होऊ लागली आहे. या व्यायामशाळांचे एकत्रित उद्घाटन राणाच्या म्हणजेच हार्दिकच्या हस्ते करण्याचा घाटही घालण्यात आला होता. मात्र तसे झाले नाही पण कोल्हापूरात अनेक नव्या जिमही सुरू झाल्या आहेत, असे हार्दिकने सांगितले. याआधी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका कोकणात सुरू झाल्याने तेथील पर्यटन वाढले होते. आता कोल्हापुरातही ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे चित्रीकरण जिथे सुरू आहे तिथे शनिवारी-रविवारी जवळपास हजाराच्या वर लोकांची गर्दी असते, असे हार्दिकने सांगितले. मात्र या गर्दीत हार्दिकच काय मालिकेतील कुठल्याही कलाकारांना त्रास होऊ नये आणि त्यांचे चित्रीकरण सुरळीत सुरू रहावे, यासाठी तिथल्याच स्थानिक तरुणांनी ‘झेड प्लस’ नावाने ग्रुप सुरू केला आहे. आपला रोजचा कामधंदा सांभाळून ही मंडळी आमच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवतात. आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही तेच करतात. ‘सीआयडी’लाही तालीम नाही ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका साडेसात ते आठ या वेळेत दाखवली जाते. या अध्र्या तासात सगळ्या तालमी बंद असतात, या वेळी सेटवरही कुणी येत नाही. सगळे घरी बसून मालिका बघतात. मध्यंतरी ‘सीआयडी’ मालिकेच्या टीमला संध्याकाळी सहा ते सकाळी आठ या वेळेत तालमीत चित्रीकरण करायचे होते. मात्र त्यांना साडेसात ते आठ चित्रीकरण करणार नाहीची अट घालण्यात आली. त्यांनी अट मान्य केली नाही तेव्हा त्यांना चित्रीकरणासाठी तालीम द्यायलाच त्यांनी नकार दिला, असा अनुभवही हार्दिकने सांगितला. आत्तापर्यंतच्या मालिका या कृत्रिम सेटवर चित्रित झालेल्या आहेत. ही मालिका पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये अगदी शेतात, तिथल्या अस्सल मातीत चित्रित झाली आहे. त्यामुळे लोकांना ती आपलीशी वाटते आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे आत्तापर्यंत शेती-व्यवसाय करणाऱ्या तरुणांचा कधीही गांभिर्याने विचार केला गेलेला नाही. इथे राणाच्या रूपाने त्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. - सुबोध खानोलकर, लेखक