छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. तिच्या काही मालिक संपून जवळपास १० ते १५ वर्षे उलटली आहेत. तरी देखील त्या मालिकांच्या आठवणी आजही प्रेक्षकांमध्ये जाग्या असल्याचे पाहायला मिळते. आज ७ जून रोजी छोट्या पडद्यावरील क्विन एकता कपूरचा वाढदिवस आहे. आज आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. एकताने अद्याप लग्न केलेले नाही. तिने का लग्न केले नाही याचे उत्तर तिनेच एका मुलाखतीमध्ये दिले आहे.

एकता कपूर आता ४५ वर्षांची झाली आहे. ती कधी लग्न करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिला ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर एकताने मजेशीर अंदाजात उत्तर दिले होते. त्यावेळी तिने बॉलिवूडचा भाईजान सलमान खान जेव्हा लग्न करणार तेव्हा त्याच्या दोन वर्षांनंतर ती लग्न करणार असल्याचे सांगितले होते. ‘मी लग्न करणार. सल्लू भाईच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर’ असे तिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा : या कारणामुळे करण जोहर करणार होता एकता कपूरशी लग्न

एकता कपूरने तिच्या करिअरची सुरुवात १९९५मध्ये सुरु केल्याचे म्हटले जाते. आज ती टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाते. तिच्या मालिका सर्वाधिक पाहिल्या जातात. आज एकताचा ४५वा वाढदिवस आहे आणि तिने तिच्या करिअरमध्ये ४० पेक्षा जास्त मालिका तसेच अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

तिच्या ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसौदी जिंदगी की’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘नागिन’ या मालिका विशेष गाजल्या. तसेच या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री स्मृति ईराणी, साक्षी तन्वर, श्वेता तिवारी, मौनी रॉय यांचे संपूर्ण आयुष्य एकता कपूरने बदलून टाकले.