छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल १२’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी शोमध्ये ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोड पार पडला. या एपिसोडवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यापाठोपाठ या स्पेशल एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आलेले अमित कुमार यांनी देखील शोवर टीका केली. पण शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने अमित कुमार यांना सुनावले होते. त्यांची खिल्ली देखील उडवली होती. आता आदित्यचे वडील गायक उदित नारायण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उदित नारायण यांनी नुकतीच ‘आजतक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आदित्यची बाजू घेत प्रत्येकवेळी नव्या टॅलेंटवर टीका करणे योग्य नाही असे म्हणत अमित कुमार यांना सुनावले आहे. ‘आदित्य अद्याप अल्लड आहे. हा वाद सुरु असताना आदित्य बोलला आणि संपूर्ण वाद त्याच्यावर केंद्रीत झाला. आदित्य केवळ सूत्रसंचालन करत आहे. त्यामुळे त्याला दोष देणे योग्य ठरणार नाही’ असे ते म्हणाले.

आणखी वाचा : “अलिबागकरांचं डोकं फिरलं तर…”; मनसेचा आदित्य नारायणला थेट इशारा

अमित कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत उदित नारायाण म्हणाले, ‘मी अमित कुमार यांनी हजेरी लावलेला एपिसोड पाहिला आणि तो एपिसोड ते एन्जॉय करताना दिसत होते. तुम्ही शोमध्ये येण्यास तयार झाले होतात तर म नंतर अशा गोष्टी बोलणे योग्य नाही.’

आणखी वाचा : ‘धक्कादायकच, कारण…’, अमित कुमार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन

काय म्हणाले होते अमित कुमार?
अमित कुमार यांनी हजेरी लावलेल्या एपिसोडमध्ये परिक्षक आणि स्पर्धकांनी मिळून १०० गाणी गायिली आणि किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. पण परिक्षक नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी गाणे गायल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अमित कुमार यांनी ‘मला माहिती आहे की लोकं त्या एपिसोड विषयी वाईट बोलत आहेत. शोमध्ये स्पर्धकाने कसेही गाणे गायिले तरी मला त्यांची प्रशंसा करण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच त्यासाठी ते मला चांगले मानधन देणार होते’ असे म्हटले होते.