काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'केबीसी'मधील कर्मवीर विशेष भागात ग्रामीण विकास चेतना संस्थेच्या रुमा देवी यांच्यासोबत हॉटसीटवर बसली होती. यावेळी हनुमानाने संजिवनी कुणासाठी आणली, या प्रश्नाचे उत्तर तिला देता आले नाही. एका सोप्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्यामुळे सोनाक्षीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता उत्तर प्रदेश कामगार परिषदेचे अध्यक्ष सुनील भराला यांनीदेखील सोनाक्षीला फटकारले आहे. मंत्रीपदाचा दर्जा असलेले सुनील भराला यांनी सोनाक्षीला 'धन पशू' असे म्हटले आहे. "अशा लोकांना शिकण्यासाठी वेळ नसतो आणि त्यांना फक्त पैसा कमावण्याची काळजी असते," असे देखील त्यांनी म्हटले आहे. 'सोनाक्षी ही "धन पशू" आहे. सध्याच्या काळात या अशा लोकांचा फक्त पैसे कमवण्याकडे आणि स्वत:वर खर्च करण्याचा कल असतो. त्यांना आपला इतिहास, संस्कृती आणि देवांबद्दल काही माहिती नसते. त्यांच्याकडे हे सर्व जाणून घेण्यासाठी वेळच नसतो. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असूच शकत नाही' असे सुनिल यांनी म्हटले आहे. रुपा देवी यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यामुळे त्यांना इतर स्पर्धकांपेक्षा केबीसीमध्ये खेळणे थोडे कठिण झाले होते. म्हणून या स्पर्धेसाठी त्यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची पार्टनर म्हणून निवड केली. सोनाक्षीने अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देत रुपा यांची मदत केली. मात्र अमिताभ यांनी विचारलेल्या रामायणातील प्रश्वाचे उत्तर सोनाक्षीने पटकन दिले नसल्यामुळे नेटकऱ्यांनी तिची फिरकी घेतली. ‘रामायणानुसार हनुमानाने कोणासाठी संजीवनी औषध आणले होत’ असा प्रश्न सोनाक्षीला विचारला होता. या प्रश्नासाठी ‘A- सुग्रीव, B- लक्ष्मण, C- सीता आणि D-राम’ हे पर्याय दिले होते. पण या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाक्षीचे तोंड पाहण्यासारखे होते. तिने थोडा विचार केला आणि लाइफलाईनचा वापर केला. सोनाक्षीने इतक्या सोप्या प्रश्नासाठी लाइफलाईनचा वापर केल्यामुळे नेटकऱ्यांनी सोनक्षीवर निशाणा साधला होता.