दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या 'तांडव' सीरिजचा वाद अद्यापही कायम आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी देशभरातून या सीरिजचा विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी या सीरिजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता या सीरिजपुढील अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे, असं लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. 'तांडव' या सीरिजविरोधात जवळपास ६ शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी तांडवच्या मेकर्सची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. लखनौमधील हजरतगंज येथील चार पोलीस अधिकारी मुंबईत आले असून ते पुढील तपास करणार आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर अॅमेझॉन हेड अपर्णा पुरोहित, निर्माते हिमांशु किशन मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांची चौकशी केली जाणार आहे. काय आहे प्रकरण? 'तांडव' सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हिंदू देव-देवतांची हेटाळणी करण्यात आली आहे. हा भाग पाहिल्यानंतर अनेकांनी ही सीरिज बॅन करण्याची मागणी केली. देशभरातून या सीरिजला विरोध होत असतानाच राजकीय वर्तुळातूनदेखील या सीरिजचा निषेध करण्यात आला. यात भाजपा नेते राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विरोध दर्शविला. वाचा : ‘तांडव’ शांत! वेब सीरिजमधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवणार दिग्दर्शकांनी मागितली माफी तांडवविरोधात नागरिकांचा संताप पाहिल्यानंतर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीरपणे माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच आक्षेपार्ह दृश्य हटवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.