चांगला कलाकार असणं आणि चांगला माणूस असणं याचं उदाहरण नुकतंच 'नकुशी.. तरीही हवीहवीशी' या स्टार प्रवाहवरील मालिकेच्या सेटवर पहायला मिळालं. उपेंद्र लिमयेसारख्या अनुभवी अभिनेत्याच्या हातावर गरम चहा सांडूनही त्यानं सहकलाकारांना सांभाळून घेत दृश्य उत्तम प्रकारे चित्रीत केले. त्याचं झालं असं, की रणजित (उपेंद्र) आणि नकुशी (प्रसिद्धी आयलवार) यांच्या सकाळच्या चहा देण्याच्या प्रसंगाचं चित्रीकरण सुरू होतं. ती चहा देताना रणजित तिचा हात पकडतो. मात्र प्रसिद्धीला हा प्रसंग साकारताना अवघडलेपण वाटू लागला होता. कॅमेरामनला चित्रीकरणात वाफाळता चहा दिसायला हवा होता. चित्रीकरणावेळी प्रसिद्धीकडे उपेंद्रनं ज्याप्रकारे पाहिलं त्यामुळे ती घाबरली आणि तिच्या हातून गरम चहाचा कप सुटून थेट उपेंद्रच्या हातावर पडला. गरम चहानं उपेंद्रचा हात भाजला. प्रसंगाचं गांभीर्य ओळखत चिडचिड न करता त्याने प्रसिद्धीकडे हसून पाहिलं. जे झालं त्याचा विचार न करता त्याक्षणी ते दृश्य व्यवस्थित चित्रीत करण्यासाठी त्याने तिला प्रोत्साहन दिलं. ‘नकुशी… तरीही हवीहवीशी या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेचं कथानक आता महत्त्वाच्या वळणावर आलं आहे. टीव्ही या माध्यमाची ताकद दिवसेंदिवस वाढतेय. या माध्यमाचा परिणामही अतिशय प्रभावशाली असतो. म्हणूनच टीव्ही चॅनल्सवर अधिकाधिक चांगल्या दर्जाचे कार्यक्रम, मालिका दाखवण्याची रेलचेल सुरू असते. चॅनल्सच्या या स्पर्धेत अनेकदा काही चांगले प्रयोग बघायला मिळतात. यामध्ये कधी कौटुंबिक विषय असतो तर कधी वास्तवदर्शी चित्रण असतं. कधी विनोदी अंगाने गंभीर विषय मांडलेला असतो तर कधी सामाजिक प्रश्नाची जाणीव करून देणारा विषय असतो. आशयविषयांमधल्या वैविध्यामुळे प्रेक्षकांना मात्र चांगल्या कलाकृतींचा आस्वाद घेता येतो. नेहमीच्या सास-बहू ड्रामापेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळत असेल तर प्रेक्षकांनाही ते हवंच असतं. असाच एक प्रयोगशील प्रयत्न स्टार प्रवाह सध्या करत आहे. ‘नकुशी.. तरी हवीहवीशी’ या मालिकेच्या निमित्ताने एका सामाजिक वास्तवदर्शी प्रश्नावर भाष्य केलं जात असून प्रेक्षकांचीही या मालिकेला पसंती मिळत आहे.