गेल्या आठवड्याभरामध्ये सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना महापूराने वेठीस धरलं होतं. मात्र आता या पुराचा विळखा कुठेतरी कमी होत असून दोन्ही जिल्हे स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर,सांगलीमध्ये पूरपरिस्थिती ओढावली असताना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यासोबतच आताही येथे अनेक जण मदत करत आहेत. त्यातच आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यादेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे.

उत्तर मुंबईतील काही काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत उर्मिला या बुधवारी पहाटे मिरज-इचलकरंजी-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाल्या आहेत.
कोल्हापूर, सांगली येथे पोहोचल्यानंतर उर्मिला येथील परिस्थितीची पाहाणी करणार आहे आणि सोबतच येथील येथील पूरग्रस्तांना मदतही करणार आहे.

“प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हातही महत्त्वाचा असतो. मदत करुन मी खारीचा वाटा उचलत आहे. तुम्हीही मदत करा”, असं उर्मिला म्हणाली.

दरम्यान, कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी मदत केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, अक्षय कुमार या कलाकारांचा समावेश आहे. त्यासोबतच अन्य काही कलाकारांनीही मदत केली आहे.