|| भक्ती परब

हिंदी चित्रपटांपासून काही काळ दूर राहून आपल्या पद्धतीने नवे काही शिकत, छंद पूर्ण करण्यावर भर देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. राजकारणात सक्रिय सहभागी होण्याचा तिचा हा निर्णय चाहत्यांना नवलाईचा असला तरीही उर्मिलाने हा निर्णय एका क्षणात घेतलेला नाही..

मला असं वाटायला लागलं की खरोखरच चार लोकं मिळून आपापसात चार भिंतींमध्ये चर्चा करत राहिले, तर कसं होणार? त्यासाठी कुणी तरी आवाज उठवला पाहिजे. तसेच आता नाही तर मग कधी? आपण आता बोललो नाही, तर खूप उशीर होईल. गेल्या पाच वर्षांत अशा अनेक घटना घडल्या जेव्हा एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून भाष्य करावं असं वाटलं, पण तेव्हा नाही केलं. कारण असं झालंय की आपल्यातल्या प्रत्येकामध्ये एक प्रकारचं औदासीन्य आलेलं आहे. हे तर काय आता असंच चालणार, हे आता कुठे बदलणार, आपण यात कशाला पडा? अशी मानसिकता आपल्या मनात जोर धरू लागल्यामुळे आपण बोलत नाही. हेच विचार मनामध्ये सुरू असताना काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याविषयी विचारणा झाली आणि मी निर्णय घेतला,’ असं उर्मिलानं सांगितलं.

गेल्या काही वर्षांतील घटना व्यथित करणाऱ्या होत्या. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या या देशात होतात. त्यांचे मारेकरी अजून पकडले गेले नाहीत. तसंच सामाजिक जाणिवा असलेले मोठे कलाकार जेव्हा आपली मतं व्यक्त करतात तेव्हा त्यांच्यावरही टीकेची झोड उठवून दुसऱ्या देशात निघून जा वगैरे असं सांगितलं जातं. त्यांचा संबंध त्यांच्या धर्माशी जोडला जातो. जातीयवादसुद्धा जोर धरतो आहे, शहरांची नावं बदलली जात आहेत, पण शहराचा विकास करण्याचा विचार केला जात नाही. या सगळ्या गोष्टींमुळे कुठल्याही सज्ञान नागरिकाला वाईटच वाटेल, मी ही त्यापैकीच एक असल्याचं ती म्हणाली.  ‘भाजप’चा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याविषयी तिला विचारलं असता उर्मिलानं सांगितलं, तो अमुक एका पक्षाचा बालेकिल्ला आहे हे कोणी ठरवलं? पाच र्वष भाजप तिथे होता, त्या आधी दहा र्वष काँग्रेस पक्षही होता. मुळात बालेकिल्ला या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. अचानक कलेच्या क्षेत्रातून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात मी आले असल्याची जाणीव मला आहे. माझ्या विरोधात उभे राहिलेलेसुद्धा ताकदीनिशी रिंगणात उतरतील. निवडणूक लढवणं हे नेहमी प्रत्येकासाठी आव्हानच असतं. दुसरा मुद्दा म्हणजे ही फक्त नटवी बाहुली आहे, हात हलवायला आणि हसून नमस्कार करायला मला आणलंय, असं जे समजतायत ते त्याच गैरसमजात राहू देत. काही गोष्टी कृतीतून सिद्ध होतात, त्या गोष्टी बोलून  सिद्ध होत नाहीत. मी कृतीतून दाखवून देणार आहे. लवकरच मी सगळ्यांशी संवाद साधणार असून त्यानंतर माझ्याविषयी असलेले गैरसमज दूर होतील.

अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मराठी घरातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यामुळे मला परिस्थितीची नीट जाणीव आहे. माझी समज, माझ्याकडे असलेलं ज्ञान, जागरूकता ही माझ्या वयानुसार जास्त वाढली असल्याने मी अजिबात घाबरत नाही. लोकांशी निगडित कुठल्याही नव्या क्षेत्रात प्रवेश करतो, तेव्हा बोरी आणि बाभळी असतातच, याची जाण ठेवूनच आपण विचार पूर्वक राजकारणात पाऊल टाकले असल्याचे उर्मिलाने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. माझं वाचन, सामाजिक, वैचारिक गोष्टींविषयी असलेलं ज्ञान हे सगळं फक्त मला माहिती आहे. इतरांना ते माहिती नाही. त्यामुळे माझ्या विरोधात अन्य राजकीय पक्षातील लोक काय बोलतात, यापेक्षा माध्यमं माझ्याविषयी काय मांडतात ते मी महत्त्वाचं मानते. कारण माध्यमांमुळेच माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. मात्र सध्या माध्यमांवरही सामाजिक दबाव असल्याचं तिनं सांगितलं.

चित्रपटसृष्टीत आजवर राजकीय पाश्र्वभूमीवरचे अनेक चित्रपट सादर झाले. त्यातील राजकारण आणि हे सक्रिय राजकारण यातील फरक सांगणं कठीण आहे. विविध दिग्दर्शकांनी, वेगळ्या विचारांनी ते चित्रपट साकारले होते. त्या सगळ्याच राजकीय चित्रपटांचं एकाच प्रकारे मूल्यमापन करणं बरोबर नाही. कलाकारांचं राजकारणात येणं गांभिर्याने घेतलं जात नाही, यासाठी कलाकारच जबाबदार आहेत. गेल्या काही वर्षांत कलाकारांची सामाजिक बांधिलकीही कमी झाली आहे. राज कपूर, व्ही. शांताराम, बलराज सहानी या सगळ्यांनी सामाजिक गोष्टींना चित्रपटात आणलं. व्ही. शांताराम यांनी सामाजिक आशय असलेले चित्रपटच जास्त केले. राज कपूर यांनीही त्यांच्या चित्रभाषेमध्ये कम्युनिझमला धरून त्यांची जी विचारसरणी होती त्यावर चित्रपट केले. बलराज सहानी यांचे सामाजिक योगदान खूप मोठं आहे. कैफी आझमी, शबाना आझमी, स्मिता पाटील इथपर्यंतच्या कलाकारांनी सामाजिक बांधिलकी मानली. त्याच्यानंतर काही काळ या गोष्टी कमी झाल्या, पण त्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही, असेही उर्मिला म्हणाली.

समाजमाध्यमांचा वापर करून कलाकारांवर अनेकदा दबाव टाकला जातो, ट्रोलिंग केलं जातं. समाजमाध्यम हे एक दुधारी शस्त्र आहे. समाजमाध्यमांवरून माझ्यावर जी टीका होत आहे, त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार नाही. त्याला समाजातील लोकही जबाबदार आहेत. मी कुठल्याही समाजमाध्यमांवर नाही, फक्त ‘इन्स्टाग्राम’वर आहे. तिथे मी काही छायाचित्रं पोस्ट करत असते. परंतु कधीही नकारात्मक प्रतिसाद आला नाही. पण राहुल गांधी यांच्यासोबतचे छायाचित्र पोस्ट केल्यावर नकारात्मक प्रतिक्रिया वाढल्या. हे कोण करतंय, हा प्रश्न मलाही पडलाय. विरोधकांकडून समाजमाध्यमांवर प्रचार करण्यासाठी जेवढा पैसा ओतला जातोय, तो विकासासाठी वापरला असता तर काही शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते, असंही उर्मिला परखडपणे म्हणाली. समाजमाध्यम वाईट नाही, पण त्याचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जातोय, ते वाईट आहे. तरुणाईने अत्यंत जागरूकपणे राजकारणाकडे पाहिलं पाहिजे. मला राजकारणात रस नाही, कोण यात पडेल असा विचार तरुणांनी करणं चुकीचं आहे. अभ्यासाकडे लक्ष द्या, पण समाजमाध्यमांवर टिंगल-टवाळी करण्यात वेळ घालवू नका, असा सल्लाही तिने तरुणाईला दिला. हिंदी किंवा मराठी चित्रपटात एखादी भूमिका मनापासून आवडत नाही तोवर मी भूमिका स्वीकारणार नाही, असे सांगत सध्या तरी राजकारणालाच प्राधान्य देणार असल्याच तिने स्पष्ट केले.

एक व्यक्ती आणि स्त्री म्हणून माझ्यासमोर लहानपणापासून इंदिरा गांधी यांचेच नाव समोर येते. त्यांचं व्यक्तिमत्त्व खंबीर होतं. महिलेचं खच्चीकरण करणं सोपं असतं, असं काही जणांना वाटतं. पण ती स्त्री जर स्वत:च खंबीर, स्वतंत्र विचारांची असेल तर तिचे खच्चीकरण करणं अशक्य आहे. म्हणूनच इंदिरा गांधी यांना मी आदर्श मानत असल्याचंही उर्मिलानं सांगितलं.

मुस्लीम धर्माच्या व्यक्तीशी लग्न केलेली मी काही पहिली स्त्री नाही. माझ्या नावावरून होणारी टीका म्हणजे सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण आहे. या सगळ्याच्या विरोधात आपण सगळे उभे राहिलो नाही तर फार उशीर होईल. मी माझा धर्म बदललेला नाही आणि माझ्या सासरच्या कोणीही मला धर्म बदल म्हणून सांगितलं नाही. सर्वधर्मसहिष्णुता हा आपल्या देशाचा पाया असून आपण तोच विसरत चाललो आहोत.    – उर्मिला मातोंडकर