नाटकाच्या मुख्य कथानकातली पात्र जेव्हा प्रसंगाआड असतात, तेव्हा काय घडत असेल हा नव्या शक्यतांना जन्म देणारा भाग असतो. आपल्याकडे नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची मोठी परंपरा आहे. पण ‘त्या दरम्यान’ काय घडले असेल याचा स्वतंत्र नाट्यकृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा प्रयत्न घडावा आणि नवे काही हाती लागावे म्हणून ‘अस्तित्व’ने ‘त्या दरम्यान’ हा उपक्रम हाती घेतला त्यातून युवा नाट्यलेखक हृषिकेश कोळी याने जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकावर आधारित त्या दरम्यान ‘वर खाली दोन पाय’ या नाटकाच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे. या नाटकात त्या दरम्यान घडणारी गोष्ट म्हणजे अजरामर पात्रांची मानसिकता शोधायला निघालेल्या आजच्या नटांना ८६ सालातलं पात्र वेगळ्या भुमिकेत शिरलेली भासू लागतात आणि लेखकाने लिहलेलं खरं नाटक करण्यास नकार देऊन, नटांच्या कल्पनाशक्तीसमोर आव्हान निर्माण करतात. तिथे सुरु होतो नट विरुध्द पात्र असा अनाकलनिय संघर्ष. या नाटकाचा आशय,विषय आणि अभिव्यक्ती यामुळे हे नाटक त्याच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अभिवाचनापासून चर्चेत होतं. पण ते रंगभूमीवर आणण्याचे धाडस ‘रंगालय’ या वैशाली भोसले आणि सुगंधा कांबळे यांच्या युवा रंगकर्मींच्या संस्थेने ‘अस्तिव’च्या सहयोगाने केले. चौकटी भेदून नव्या नाट्यशक्यता आजमवण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली असून लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश, संगीत यात वेगळा प्रयोग करणारे हे नाटक म्हणूनच रंगभूमीवर आणण्याचे संस्थेने ठरवले. सुशिल ईनामदार, नंदीता पाटकर, रोहन गुजर, संग्राम समेळ, पल्लवी पाटील, मयुरा जोशी, अमेय बोरकर, अजित सावंत या प्रथितयश कलावंतांसोबत स्मृती पाटकर आणि चंद्रकांत मेहेंदळे या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. गेले सव्वा दोन महिने या नाटकाची कसून तालीम सुरु आहे. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे या प्रयोगाला सृजन मार्गदर्शन लाभले आहे.