बॉलिवूडमधील बहुचर्चित ठरलेला अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाहसोहळा २४ जानेवारी रोजी संपन्न झाला आहे. नताशा ही वरूणची लहानपणीची मैत्रीण आहे. आता यांचं लग्न झाल्यानंतर वरूणची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत वरूणने त्याच्या लव्हस्टोरी बद्दल सांगितले आहे. करीनाच्या चॅट शो ‘वॉट वुमन वॉन्ट’मध्ये पाहुणा म्हणून वरूण आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या आणि नताशाच्या रिलेशनशिपबद्दल आणि त्यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली यावर वक्तव्य केलं होतं. "मी सहावीत असताना नताशाला भेटलो होतो. तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. अकरावी किंवा बारावीपर्यंत आम्ही चांगले मित्र होतो. पण मला आठवतंय की जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा आम्ही मॅनेकेजी कूपर या शाळेत होतो. ती यलो हाऊस आणि मी रेड हाऊसमध्ये होतो. आम्ही बास्केटबॉलच्या कोर्टमध्ये होतो आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली की ते आम्हाला स्नॅक्स द्यायचे. अजुनही मला ती समोरुन येताना आठवते. मी तिला पाहिले आणि मला असे वाटले की मी तिच्या प्रेमात पडलो. तिने मला तीन ते चार वेळा नकार दिला होतो. पण मी आशा सोडली नाही," असं वरूण म्हणाला. वरूण आणि नताशा यांचा लग्नसोहळा अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती पार पडला. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी झाले होते.