‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटानंतर अभिनेता विकी कौशल खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला होता. विशेष म्हणजे सध्या प्रत्येक तरुणींच्या मनावर विकी कौशल राज्य करत आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्याचीदेखील चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच विकी आणि अभिनेत्री हरलीन सेठी यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपमुळे हरलीनला मानसिक धक्का बसून ती नैराश्यात गेली होती.

हरलीनने नुकतीच सोशल मीडियावर एक ब्रेकअप पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘मी कुठून सुरूवात केली आणि मी कुठे पोहोचले. मी माझ्या आयुष्याचा हा रस्ता निवडला नव्हता, त्याच्या इच्छाशक्तीने तो तयार झाला होता’ असे लिहिले होते. हरलीनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली दिसत आहे.

विकी आणि हरलीन यांनी बराच काळ आपले नाते अधिकृतरित्या जाहीर केले नव्हते. मात्र ‘उरी’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दोघांनीही एकत्र फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. हरलीनने विकीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना सुरूवात झाली. विशेष म्हणजे त्यांच्या ब्रेकअपमागील कारण भूमी पेडणेकर असल्याची चर्चा आहे. याआधी विकी आणि हरलीनचे ब्रेकअप कतरिनामुळे झाल्याचे म्हटले जात होते.

विकी कौशल लवकरच राकेश शर्मा बायोपिकमध्ये झळकणार आहे. तसेच करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातदेखील तो मुख्य भूमिकेत असणार आहे. करिना कपूर, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकरदेखील या चित्रपटात दिसणार आहेत.