अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जाण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनीच या अभिनेत्रीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. काहींनी तर बॉलिवूडची चांदनी निखळली असं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांच्या जाण्याने कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. पण ‘मिस्टर इंडिया’, ‘लम्हे’, ‘चांदनी’, ‘चालबाज’, ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.

श्रीदेवी यांच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत अतिशय महत्त्वाचा ठरलेला चित्रपट होता ‘मिस्टर इंडिया’. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि श्रीदेवी अशी जोडी रुपेरी पडद्यावर आली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. नात्याने अनिल कपूर श्रीदेवी यांचे दीर असले तरीही रुपेरी पडद्यावर या जोडीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनाने अनिल कपूर यांनाही धक्का बसला होता.

https://www.instagram.com/p/BfqNGOOHEiV/

वाचा : BLOG : या अभिनेत्रींचं धक्कादायक जाणे…

आपल्या अनोख्या अंदाजात रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या या जोडीचा एक शेवटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या पुतण्याच्या लग्नात अनिल आणि ‘श्री’ हे दोघंही ‘चिटीया कलाइयां वे’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. मोहित मारवाहच्या लग्नाच्या निमित्ताने संपूर्ण कपूर कुटुंबिय दुबईमध्ये गेले होते. त्याचवेळचा हा व्हिडिओ असून, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे लग्नाच्या उत्साही वातावरणाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या श्रीदेवी अशा अचानक एक्झिट घेतील अशी कोणी अपेक्षाही केली नव्हती.