अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या ‘कहानी २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कहानी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री विद्या बालन बरीच चर्चेत आली होती. पतीच्या शोधात एका गरोदर महिलेच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली विद्या बालन लवकरच कहानी २ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा नव्या रहस्यासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, सध्या मात्र विद्या गाजत आहे ते म्हणजे दुसऱ्याच कारणासाठी. विविध चित्रपटांमध्ये काम करणारी विद्या तिच्या पतीच्या म्हणजेच सिद्धार्थ रॉय कपूरच्या चित्रपटांमध्ये मात्र काम करताना दिसलीच नाही. विद्या सिद्धार्थच्या चित्रपटांमध्ये काम का करत नाही? यामागचे कारण तिनेच स्पष्ट केले आहे. सिद्धार्थसोबत लग्न केल्यानंतरच विद्याने त्याची निर्मिती असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करणार नसल्याचा निर्णय घेतला होता.

वाचा: ‘ब्रँड’ विद्या बालनची दुसरी ‘कहानी’

याबाबतच बोलताना विद्या म्हणाली की, ‘मी आणि माझ्या पतीने आधीच ठरवले होते की, आम्ही एकमेकांसोबत काम करणार नाही. कारण, पती-पत्नीच्या नात्यामध्ये आम्ही कामाचे वातावरण बनवू इच्छित नव्हतो. या निर्णयामुळे आमच्या नात्याला फायदाच झाला’. नात्याच्या फायद्यासाठी विद्या आणि तिच्या पतीमध्ये झालेल्या या निर्णयाबाबत सांगताना यापुढे विद्या म्हणाली की, ‘उद्या जर मी एखाद्या चित्रपटात काम करत आहे आणि त्या चित्रपटातील एखादी गोष्ट मला खटकली आणि त्या चित्रपटाचा निर्माता माझा पती असेल तर त्याला मी ती बाब सर्वांसमोर स्पष्टपणे नाही सांगून शकत. त्याच जागी जर कोणी दुसराच निर्माता असेल तर ते मी स्पष्टपणे सांगू शकेन. अथवा माझा रागही व्यक्त करु शकेन’, असेही विद्या म्हणाली.

वाचा: यंदा नायिकाप्रधान चित्रपटांची चलती!

दरम्यान विद्या बालन तिच्या ‘कहानी २’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कहानी’च्या पहिल्या भागाप्रमाणे सिक्वलचे दिग्दर्शनही सुजॉय घोषच करत आहे. विद्याच्या ‘कहानी २’ची झलक ही थक्क करणारी असल्यामुळे तिच्या पहिल्या ‘कहाणी’प्रमाणे या दुसऱ्या कहाणीत नक्की काय रहस्य असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, विद्या बालनचा ‘कहानी २’ आणि आलिया भट्टचा ‘डियर जिंदगी’ या दोन चित्रपटांमध्ये टक्कर होऊ नये यासाठी निर्माता जयंतीलाल यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. २ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.