गेल्या वर्षी इटलीत विराट आणि अनुष्कानं लग्नगाठ बांधली. पण, काम आणि भारतीय क्रिकेट संघाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे या जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यास मिळत नाही. म्हणूनच या दोघांनी वर्षांतले २१ दिवस क्रिकेट आणि अभिनयापासून चार हात लांब राहून एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं ठरवलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचे दौरे सुरू होते. तर लग्नानंतर काही दिवसांत अनुष्कादेखील ‘झिरो’च्या सेटवर परतली होती. त्यामुळे या दोघांनाही हवा तेवढा वेळ एकत्र घालवता आला नाही. विराटचं येणाऱ्या काळातलं वेळापत्रकही व्यग्र आहे. त्यातून अनुष्का ‘झिरो’बरोबरच ‘मेड इन इंडिया’, ‘सुई धागा’ या चित्रपटातही दिसणार आहे. अनेक उत्पादन कंपन्यांचे अनुष्का आणि विराट सदिच्छा दूत आहेत त्यामुळे पुढचे किमान दोन एक वर्षे या दोघांचंही वेळापत्रक खूपच व्यग्र असणार आहे. येणाऱ्या काळातही कामावरच्या निष्ठेपोटी त्यांना एकमेकांना हवा तेवढा वेळ देता येणार नाही.

म्हणूनच यातून मार्ग काढत या दोघांनी वर्षांतले २१ दिवस एकमेकांसोबत घालवायचे ठरवलं आहे. या काळात अभिनय आणि क्रिकेटपासून लांब राहून फक्त दोघांनी वेळ घालवायचा असा संकल्प त्यांनी केला आहे.