भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली प्रेमात पडण्याच्या योग्यतेचा का आहे हे त्याची पत्नी अनुष्का शर्मानं भारत ऑस्ट्रेलिया सामन्यातील एका घटनेचा संदर्भ देत सांगितलं आहे. विराट हा अत्यंत आक्रमक खेळाडूच नाही तर एक सह्रदय व दुसऱ्यांना मदत करणारी चांगली व्यक्तीदेखील आहे अशी पोस्ट अनुष्कानं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याची भारतीय प्रेक्षकांनी चीटर असं ओरडत खल्ली उडवली होती. विराट फलंदाजीला असताना स्मिथची उडवली जाणारी हुर्यो पचनी न पडलेल्या विराटनं स्मिथसाठी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवाव्यात असं सांगत प्रेक्षकांना त्यांचं वागणं चुकीचं असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. भारत ऑस्ट्रेलियामधला विश्वचषकातला सामना भारतानं जिंकला असून या विजयाबरोबरच विराटच्या या वागण्याची दखल देखील मोठ्या प्रमाणावर घेतली गेली. अनुष्कानंही ती बातमी शेअर करताना इन्स्टाग्रामवर कमेंट केली की, "विराट हा अत्यंत आक्रमक खेळाडू तर आहेच, परंतु एक चांगल्या मनाचा दुसऱ्यांना मदत करणारा माणूसही आहे. अशा व्यक्तिवर प्रेम करणं किती सोपं आहे."