भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी ११ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केलं. तेव्हापासून आजतागायत या जोडीची रोज नवनवीन चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे या जोडींमध्ये असलेलं प्रेम हे साऱ्या चाहत्यांना ठावूक आहे. काही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ट्विटवर लाखो युजर्सने लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला होता. त्यामुळे विराटचं हे ट्विट यंदाचं गोल्डन ट्विट ठरलं आहे.

प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी करवाचौथचा दिवस खास असून आपल्या पतीसाठी हे व्रत केलं जातं. त्यामुळे अनुष्कानेही विराटसाठी करवां चौथचं व्रत केलं होतं. त्यामुळे विराटने ट्विटवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर करत ‘अनुष्का माझं सर्वस्व आहे’ असं म्हणत त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. विराटने केलेल्या या ट्विटला २ लाखापेक्षा अधिक लाईक्स आणि १४ हजारपेक्षा जास्त रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामुळे विराटचं हे ट्विट यावर्षीचं ‘गोल्डन ट्विट ऑफ २०१८’ ठरलं आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी देखील विराटने लग्नानंतर अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले होते. विराट अनुष्काच्या लग्नाचे फोटोसुद्धा त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे विराटने केलेल्या ट्विटला ८८ हजार रिट्विट मिळाले होते. तर ५ लाख ४४ हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले होते.त्यामुळे २०१७ चं गोल्डन ट्विट हा बहुमानदेखील विराटलाच मिळाला होता.