सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान करणाऱ्या घटनाही घडल्या. देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर अभिनेत्री कंगना रणौतनं आंदोलकांना सुनावलं होते. तिच्या या व्यक्तव्यावर अनेकांनी निशाणा साधला होता. आता लोकप्रिय गायक विशाल ददलानीने देखील कंगनाला सुनावले आहे.

‘कोणी इतकं अज्ञानी कसं असू शकतं? हा विशेषाधिकारातील आवाज आहे, ती इतरांपेक्षा किती वेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक भारतीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कर भरतो. प्रत्येक व्यवहारावर जीएसटी आकारण्यात येतो. त्यामुळे श्रीमंतांनी आपण इतरांपेक्षा खुप वेगळे आहोत, हाच विचार करणे थांबवण्याची गरज आहे’ असे विशालने ट्विट करत कंगनाला सुनावले आहे.

कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपट येत आहे. त्याच्या प्रमोशनदरम्यान कंगनाला देशात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी विचारण्यात आले होते. त्यावर कंगना म्हणाली, “जेव्हा तुम्ही आंदोलने करता तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हिंसक व्हायला नको. आपल्या लोकसंख्येच्या ३ ते ४ टक्के लोक फक्त कर भरतात. बाकी लोक त्या करावर जगतात. तुम्हाला बस, रेल्वे जाळण्याचा अधिकार कोणी दिला? एका बसची किंमत जळपास ७० ते ८० लाख रुपये असते. ही रक्कम छोटी नाही. तुम्ही कधी आपल्या देशातील लोकांची परिस्थिती पाहिली आहे का? काही लोक उपाशी आणि कुपोषणानं मरतात,” असं कंगना म्हणाली होती.

त्याचबरोबर “हे माझं वैयक्तिक मत आहे की, लोकशाहीच्या नावाखाली आपण अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळात असल्यासारखं वाटते. ज्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता. लोकांना बळाच्या आणि बंदूकीच्या धाकावर डांबून ठेवलं जात होतं. परकीय सत्तेविरुद्ध आंदोलन करणे, देश बंद करणे, कर न भरणे चालायचे. परंतु आज लोकशाहीमध्ये आपले नेते आपल्यापैकीच आहे. ते काही काही जपान, इटलीहून आलेले नाहीत” असे कंगना म्हणाली होती.