महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचं तिन्हीसांजेला दर्शन घडवणारी 'विठूमाऊली' ही स्टार प्रवाहची मालिका महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाली आहे. सानथोर, गाव, शहर अशा सर्वच ठिकाणी विठ्ठलभक्त 'विठूमाऊली' मालिकेमुळे विठूनामाचा गजर करत तल्लीन होत आहेत. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या पौराणिक मालिकेतून सादर करण्यात आली आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडत आहे. त्याशिवाय पंढरपूर क्षेत्राची निर्मिती, विठ्ठल पालखी सोहळा, विठ्ठलाचं मुकुट आणि आभूषणे यांच्याही रंजक कथा या मालिकेतून पहायला मिळत आहेत. उत्तम निर्मितीमूल्य, पट्टीचे कलाकार आणि अभ्यासू लेखनामुळे या मालिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 'विठूमाऊली' साकारणाऱ्या अजिंक्य राऊतला अनेक प्रेक्षकांनी फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे मेसेज करून मालिका आवडत असल्याचं कळवलं. मालिकेला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीविषयी अजिंक्य म्हणाला, "खूप ठिकाणचे तरूण मला 'विठूमाऊली' मालिका आवडत असल्याचं कळवतात. त्यांना शीर्षक गीत आवडतं, गोष्टीची मांडणी आवडते, मालिकेची भव्यता आवडते. कित्येक ज्येष्ठ प्रेक्षक दर्शन घेण्याच्या भावनेतून संध्याकाळी टीव्हीसमोर येऊन बसतात. माझ्या ओळखीतील एक गुजराती आजी आहेत. त्यांना नीट मराठी कळत नाही. मात्र, 'विठूमाऊली' मालिकेत कृष्णाचं दर्शन होतं म्हणून त्या आवर्जून मालिका पाहातात." VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती स्टार प्रवाहची 'विठूमाऊली' ही मालिका पाहण्याची प्रत्येक प्रेक्षकाची भावना वेगळी आहे. मात्र, प्रत्येकाला 'विठूमाऊली' आवडते हेच यातून दिसून येतं. मालिकेत या पुढील काळात अनेक नवनव्या घटना, कहाण्या पाहायला मिळणार आहे.