प्रिती झिंटा आणि बिपाशा बासू यांच्यानंतर आता आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. अमृता रावने सोमवारी रेडिओ जॉकी अनमोलबरोबर लग्नगाठ बांधली. अमृता आणि अनमोलचा लग्नसोहळा अत्यंत खासगी पद्धतीने पार पडला. यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि मोजके नातेवाईक उपस्थित होते. गेल्या सात वर्षांपासून अमृताने अनमोलबरोबरचं आपले नाते कधीच सार्वजनिक केले नव्हते. अमृता सध्या ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेमध्ये काम करत आहे. ‘इश्क-विश्क’ चित्रपटाद्वारे अमृताने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, तर ‘सत्याग्रह’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. याशिवाय, ‘विवाह’, ‘मै हू ना’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.