अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाला रुंजी घालणारी मालिका ‘तुला पाहते रे’ येत्या जुलै महिन्यात निरोप घेणार आहे. या मालिकेतील मुख्य कलाकार सुबोध भावेनं सोमवारी ही माहिती दिली. मालिकेत सुबोध साकारत असलेली विक्रांत सरंजामेची भूमिका व गायत्री दातार साकारत असलेली इशा निमकरची भूमिका चांगलीच गाजली. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातच इतकी लोकप्रियता मिळाल्याबाबत तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात असताना यापुढे काय करणार हेसुद्धा गायत्रीने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.

‘कामासाठी मी सगळे पर्याय खुले ठेवले आहेत. मालिकेत काम केल्याचा अनुभव आल्याने मला पुढेही मालिकेत काम करायला आवडेल. चित्रपटातही भूमिका साकारायला आवडेल. एका चित्रपटात मी काम केलं आहे. त्यानंतर वेब सीरिज हे असं माध्यम आहे ज्यात मी अजून काम केलं नाही. तरुणाई ही वेब सीरिजशी जास्त जोडली गेली आहे असं मला वाटतं. मला वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली तर मी नक्कीच करेन. नाटकातही काम करण्याची इच्छा आहे. कारण रंगमंचावर अभिनय करण्याचा जो थरार असतो, तो मला अनुभवायचा आहे. त्यामुळे जी संधी मला मिळेल ती मी स्वीकारेन,’ असं तिने सांगितलं. याचसोबत फक्त मुख्य भूमिकाच करेन अशी कोणतीही अट नसल्याचं ती सांगते. एखादी भूमिका खूप चांगली असेल पण ते जर फक्त चित्रपटात दहा मिनिटांसाठी असेल तरीही मी करेन, असं ती पुढे म्हणाली.

पहिल्या प्रेमासारखीच ही मालिका खास असल्याचं गायत्री म्हणते. १४ वर्षांपूर्वी तिने सुबोध भावेसोबत काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि या पहिल्याच प्रोजेक्टमधून ते पूर्ण झालं. त्यामुळे या मालिकेशी निगडीत बऱ्याच आठवणी मनात कायम राहतील, अशी भावना तिने व्यक्त केली.