पाकिस्तान कलाकारांसाठी भारतीय चित्रपट सृष्टीचे दरवाजे बंद झाले आहेत. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनने (इम्पा)ने आपल्या ७७ व्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तान कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेतला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढला होता. राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. त्यांनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल अशी धमकीही मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिली होती.
पाकिस्तानी कलाकारांना घालण्यात आलेल्या बंदीचा सर्वात मोठा फटका करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटाला पोहचणार आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी या दोघांनीही नवी युक्ती लढवले असल्याचे कळते. ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘रईस’ या चित्रपटांचे प्रदर्शन आणि त्यामुळे होणारे नुकसान यासाठी निर्माते सज्ज झाल्याचे दिसते. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, निर्माता करण जोहरला या बंदीनंतर भारतात बरेच नुकसान होणार आहे. त्यामुळे इंटरनॅशनल मार्केटद्वारे चित्रपटातून जास्तीत जास्त नफा कमविण्याचा प्रयत्न तो करेल. त्यासाठी त्याची संपूर्ण टीम यावरच लक्ष केंद्रीत करून आहे. व्यापार समीक्षक आणि सुपर सिनेमा मासिकाचे संपादक अमुल मोहन यांच्या मते बंदी घालण्याने कोणालाच काही फायदा होणार नाही. शांत बसून यावर पर्याय शोधण्याची गरज आहे. फवाद खान, माहिरा खान, संगीत दिग्दर्शक, गायक आतिफ असलम, राहत फतेह अली खान यांसारखे अनेक लोक बॉलीवूडशी जोडले गेलेले आहेत. निर्मात्यांना त्यांच्या बदली दुस-यांकडून काम करवून घेणे कठीण आहे. कारण बाजारात आधीच जो पैसा लागला आहे तो परत मिळणार नाही.
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. लष्कराच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत झाले. याच दरम्यान पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णय इम्पाच्या सर्वसाधारण बैठकीत एक मताने संमत झाला. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आता भारताच्या चंदेरी दुनियेत स्थान मिळणार नसल्याचे पक्के झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 12:16 pm