अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग येत्या काळात विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ते दोघं एकमेकांना डेट करत असून, सरतेशेवटी आता त्यांच्या नात्याची गाडी या थांब्यावर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. रणवीरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी दीपिकाचं नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडलं गेलं होतं. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत या जोडीच्या रिलेशनशिपने सर्वांचं लक्षही वेधलं होतं. पण, त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या.

रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. या नात्याच्या तुटण्याने तिला धक्काच बसला होता. एका मुलाखतीत तिने याविषयीचा खुलासा केला होता जी आता पुन्हा चर्चेत आली आहे. आपल्यासोबतची व्यक्ती आपल्याला फसवत आहे, हे दीपिकाला ठाऊक होतं. पण, तरीही तिने त्या व्यक्तीची साथ सोडली नव्हती. दीपिकाने त्या मुलाखतीत नाव न घेता नेमकं हे नातं का तुटलं याविषयीचा खुलासा केला होता.

‘माझ्यासाठी एखाद्या व्यक्तीशी शारीरिक रित्या जवळ येण्याला भावनिक महत्त्वंही आहे. मी कधीच रिलेशनशिपमध्ये असताना कोणाला फसवलं नव्हतं. सर्वांना फसवायचच असतं तर मुळात मी रिलेशनशिपमध्येच का आले असते? त्यापेक्षा एकटं राहणं कधीही उत्तम. सर्वच असा विचार करतात असं नाही आणि म्हणूनच मी या यातना सहन केल्या होत्या. त्याला दुसरी संधी देणारी मीच चुकले होते. त्याने माझ्याकडे दुसरी संधी मागितली, क्षमा मागितली आणि मी ती संधी त्याला दिली. त्यानंतर मी त्याची चोरी रंगे हाथ पकडली होती. त्या धक्क्यातून सावरणं मला खरंतर खूप जास्त कठीण गेलं. पण, त्या वळणावरुन आता मागे फिरणं कदापि शक्य नव्हतं. मी त्या संकटातून तरले होते’, असं दीपिका म्हणाली होती.

दीपिकाने नेमकं तिच्या आयुष्यात आलेल्या या नात्यात आपलं काही चुकतंय का, याविषयीसुद्धा विचार केला होता. पण, किंबहुना या नात्यासाठी आपण सर्वस्व अर्पण केलं होतं. पण, तिला मात्र त्याबदल्यात नात्यात केवळ निराशाच मिळाली होती. अखेर तिने या नात्यात अडकून न राहता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा : आभाळाएवढा माणूस

सध्याच्या घडीला दीपिका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत असून, ती आयुष्यातील हा टप्पा बराच मागे सोडून आली आहे. किंबहुना रणवीरसोबतचं नातं पाहता तिच्या आयुष्यात प्रेम परतलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.