बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्ट आणि दिग्दर्शक करण जोहरला ट्रोल करण्यात येत आहे. अनेक जुने व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दितायेत. अशातच बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाने लिहिलेल्या पुस्तकातील एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये करण जोहरने नंबर देऊन फोन उचलला नसल्याचे म्हटले आहे.

आयुषमान अभिनेता होण्यापूर्वी आरजे होता. आरजे असल्यामुळे त्याने करण जोहरची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये आयुषमानने त्याला अभिनेता होण्याची इच्छा असल्याचे करणला सांगितले होते. तेव्हा करणने त्याचा ऑफिसमधील नंबर आयुषमानला दिला होता. तो नंबर घेतल्यावर आयुषमान फार आनंदी झाला होता. त्यानंतर आयुषमानने धर्मा प्रोडक्शनमध्ये फोन केला. त्यावेळी ऑफिसमधील एका व्यक्तीने करण तेथे नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला. त्यावेळी करण कामात व्यग्र असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर त्याने पुन्हा फोन केला तेव्हा त्यांनी आम्ही फक्त स्टार किड्स सोबत काम करतो आणि तुमच्यासोबत करु शकत नाही असे म्हटले असल्याचे आयुषमानने म्हटले आहे.

आयुषमानच्या पुस्तकातील हा किस्सा पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयुषमानने दिग्दर्शक सुरजित सरकर यांच्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘पानी दा रंग’ हा आयुषमानचा म्यूझिक अल्बमही खूप गाजला होता. आज आयुषमान बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कलाकार आहे.