'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील 'सूरज हुआ मद्धम' हे गाणं अनेकांच्याच आवडीचं आहे. सर्वोत्तम संगीतासह अनोख्या सिनेमॅटोग्राफीमुळे हे गाणं लोकप्रिय झालं आणि अजूनही अनेकांच्या प्ले-लिस्टमध्ये ते पाहायलं मिळतं. मात्र या गाण्यासोबत निर्माता- दिग्दर्शक करण जोहरची एक वाईट आठवण जोडली गेली आहे. हा किस्सा करणने स्वत:च एका मुलाखतीत सांगितला आहे. शाहरुख खान आणि काजोलच्या या गाण्याची शूटिंग इजिप्तमध्ये झाली. त्यावेळी करणला अतिसाराचा त्रास होत होता. शूटिंग ज्या ठिकाणी सुरू होती तिथे चुनखडकाच्या विशाल शिळा होत्या आणि व्हॅनिटी व्हॅनसुद्धा दोन किलोमीटर अंतरावर उभी होती. त्यामुळे नाईलाजाने त्याला चुनखडकांच्या मागे आडोशाला शौचास जावं लागलं होतं. वाचा : 'रिव्हॉल्वर दादीं'ना न्याय देऊ शकेल का ही अभिनेत्री? त्या प्रसंगाविषयी करण म्हणाला की, 'अतिसाराच्या त्रासामुळे मला तिथं उघड्यावर चुनखडकांच्या आडोशाला शौचास बसावं लागलं. कारण आसपास जवळ कोणतंच शौचालय नव्हतं. त्यावेळी आणखी एक व्यक्ती मला तिथं दिसला आणि त्यालाही बहुधा अतिसाराचा त्रास होता. ती सर्वांत लाजिरवाणी परिस्थिती होती आणि माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. फार फारा वाळवंटात शूटिंग सुरू होती आणि हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.'