अभिनेता तुषार कपूर आणि करिना कपूर खान यांची मैत्री सर्वश्रुत आहे. २००१ मध्ये 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं. त्यानंतरही बऱ्याच चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. सतीश कौशिक दिग्दर्शित 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटात तुषारने करण नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती. हा मुलगा बघताक्षणी पूजाच्या म्हणजे करिना कपूरच्या प्रेमात पडतो, असे कथानक चित्रपटात दाखवण्यात आले होते. मात्र, खऱ्या आयुष्यातही तुषार बेबोच्या प्रेमात पडला होता. इतकंच नाही तर त्याला करिनाशी लग्नसुद्धा करायचं होतं. करिना मात्र तुषारला फक्त एक चांगला मित्र मानते. एका मुलाखतीदरम्यान तुषारला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला असता आपल्याला लग्नासाठी करिना कपूरसारखीच मुलगी हवी असल्याचं त्यानं सांगितलं होतं. करिनाचा मनमोकळा स्वभाव, संयमी वृत्ती खूप आवडत असल्याचंही त्याने मुलाखतीत म्हटलं होतं. तुषार आजही करिनाला त्याची सर्वांत चांगली मैत्रीण मानतो. इंडस्ट्रीमध्ये आमच्यासारखी मैत्री कोणाचीच नसेल, असंही तो सांगतो. २००८ मध्ये आलेल्या चित्रपट 'गोलमाल रिटर्न्स'मध्ये तुषारने करिनाच्या भावाची भूमिका साकारली होती. ज्या मुलीशी तुषारची लग्न करायची इच्छा होती तिच्या भावाची भूमिका तुषारला चित्रपटात साकारावी लागली होती. २०१२ मध्ये करिनाने सैफ अली खानशी लग्न केलं आणि आता तिला तैमुर नावाचा मुलगाही आहे. तर तुषार सरोगसी पद्धतीने बाबा झाला असून त्याचा मुलगा लक्ष्य दीड वर्षांचा झाला आहे. दोघांची मुलंसुद्धा एकाच नर्सरीत जातात. तैमुर आणि लक्ष्यचा एकमेकांच्या बाजूला बसलेला एक फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता.