बॉलिवूडमध्ये एकेकाळी अभिनेत्री प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या मैत्रीच्या चर्चा असायच्या. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाच्या वेळी त्या दोघींची ओळख झाली. त्यानंतर दोघीही एकमेकींच्या खास मैत्रीणी झाल्या. त्यावेळी त्या बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या विशेष चर्चा रंगलेल्या असायच्या. पण त्या दोघींमधील मैत्रीच्या नात्यात फूट का पडली? असा प्रश्न अनेकांना आजही पडला आहे.

‘झी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिती झिंटा नेहमी स्वत:ला आउटसायडर असल्याचे मानायची. राणीसोबत मैत्री केल्यामुळे तिची ओळख बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता शाहरुख खानसोबत झाली होती. तसेच त्यांच्यासोबतही चांगली मैत्री झाली होती.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी करिअरच्या सुरुवातीला एकत्र वर्ल्ड टूरवर गेल्या होत्या. त्यावेळी त्या दोघींमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली असल्याचे म्हटले जाते. पण चित्रपटांमध्ये स्पर्धा असल्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या नात्याला तडा गेला. तसेच प्रितीला नेहमी वाटायचे की राणी तिच्यापेक्षा ऐश्वर्याच्या जास्त जवळ आहे.

‘चलते चलते’ चित्रपटासाठी सुरुवातीला शाहरुखने ऐश्वर्याला साइन केल्याचे म्हटले जाते. पण नंतर काही कारणास्तव ऐश्वर्याच्या जागी राणीला घेण्यात आले. त्यामुळे ऐश्वर्या आणि राणी यांच्या नात्यामध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच नंतर करण जोहरने ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी प्रितीला साइन केले तेव्हा राणीला वाइटले असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे हळूहळू त्या दोघी एकमेकीपासून लांब गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

त्यानंतर राणीने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील दोन अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रीणी होऊ शकत नाहीत असे म्हटले होते. तुम्ही एकमेकी विषयी कितीही चांगला विचार करा. पण जेव्हा चित्रपटांच्या ऑफरची वेळ येते तेव्हा तुम्ही एकमेकींच्या स्पर्धक होता असे म्हटले होते.