निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीने संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान केले आहे. ‘अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात” अशा शब्दांत कंगनाने जयसिंह यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत बुधवारी ‘पंगा’ या सिनेमाच्या प्रिमियरदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत कंगना बोलत होती.

इंदिराज जयसिंह यांच्यावर राग व्यक्त करताना कंगना म्हणाली, “या महिलेला चार दिवस निर्भया प्रकणातील आरोपींसोबत तुरुंगात ठेवायला हवे. या कशा महिला आहेत ज्यांना बलात्कारातील आरोपींवर दया येते. अशा महिलांच्या पोटीच असे नराधम जम्म घेतात ज्यांना बलात्कारी आणि खून्यांप्रती प्रेम असते.”

दरम्यान, वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी ट्विट करीत निर्भयाच्या आईला या प्रकरणातील आरोपींना माफ करण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी राजीव गांधी हत्याप्रकरणात सोनिया गांधी यांचे उदाहरण दिले होते.

इंदिरा जयसिंह यांच्या विधानानंतर निर्भयाच्या आईने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यांनी म्हटले होते की, “इंदिरा जयसिंह कोण आहेत, ज्या मला सल्ला देत आहेत. संपूर्ण देशाची इच्छा आहे की दोषींना फाशी दिली जावी. केवळ यांच्यासारख्या लोकांमुळेच बालत्कार पीडितांना न्याय मिळत नाही.”