प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या टीव्ही कलाकारांना वर्षांनुवर्ष एकाच भूमिकेत पडद्यावर पाहण्याची इतकी सवय होऊन जाते की त्या पलीकडेही त्यांचं विश्व असू शकतं आणि त्यात त्यांची हक्काची व्यक्ती असू शकते याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. मालिकेत पती-पत्नीची भूमिका करणारे अनेक  कलाकारांची rv01पडद्याच्या मागे एक वेगळीच प्रेमकथा बहरत असते. त्याचा सुगावाही कधीतरी लागतोच. पण, प्रेम फुलायला आणि एकदा ते नाते निर्माण झाले की ते सांभाळायलाही तितकाच वेळ द्यावा लागतो. आणि या टीव्ही कलाकारांकडे नेमका वेळेचाच अभाव असतो. गेल्या काही काळात वाढते मालिकांचे प्रमाण, त्यातील स्पर्धा त्यातून चित्रीकरणाच्या व्यस्त वेळा, प्रसिद्धी कार्यक्रम, पुरस्कार सोहळे यांच्यात गुरफटले गेल्याने कित्येक कलाकारांना त्यांचे प्रेमळ नाते फुलण्याआधीच त्याला विराम द्यावा लागला आहे. नुकतीच टीव्हीवर गाजलेली जोडी दिव्यांशा त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांनी त्यांच्या सात वर्षांच्या नात्याचा शेवट केला. त्यामागे एकमेकांसाठी पुरेसा वेळ नसणं हे एकमेव कारण होतं. यानिमित्ताने याच कारणाने टीव्हीवरील दुरावलेल्या नात्यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप..

२००६मध्ये ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेच्या निमित्ताने दिव्यांशा त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा एकत्र आले. त्यावेळी त्यांना एकमेकांमध्ये आपला भावी जोडीदार सापडला. मालिका संपली पण, त्यांचा एकमेकांसोबतचा प्रवास सुरू झाला होता. अभिनय क्षेत्रामध्ये आपला जम बसल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेऊन ते दोघेही आपापल्या वाटा शोधायला बाहेर पडले. दरम्यान, शरदने परदेशात जाऊन अभिनयाचे शिक्षण घेत चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमवायचा अयशस्वी प्रयत्न केला. दिव्यांशा उलटपक्षी टीव्हीवर बऱ्यापैकी rv03स्थिरावली. २०१३मध्ये दिव्यांशा एकता कपूरच्या ‘ये है महोबत्ते’ मालिकेतून नायिकेच्या भूमिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली. मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि दिव्यांशाही. शरदलाही ‘महाराणा प्रताप’ मालिकेत महाराणा प्रतापची भूमिका मिळाली आणि त्याचे घोडेस्वारी, तलवारबाजीचे प्रशिक्षण सुरू झाले. तिथेच त्यांच्या नात्याची गाडी अडली. मालिकेच्या चित्रीकरणामुळे शरद मुंबईबाहेर आणि दिव्यांशा मुंबईत. त्यांच्या चित्रीकरणाच्या वेळा, सुट्टय़ांची जुळवाजुळव करण्यात तारेवरची कसरत होऊ लागली आणि दोघांनीही नाइलाजास्तव आलेल्या या दुराव्याला संपवण्याऐवजी नात्यातून बाहेर पडण्याचाच निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाच्या अफवा सात वर्षांत अनेकदा कानावर आल्या पण, त्यांचं खरचं लग्न व्हावं ही इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी त्यांचं एकमेकांपासून दूर जाणं हा एक धक्काच होता. ‘आम्हाला कामामुळे एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही आहे. त्यामुळे हे नातं संपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. अर्थात, इतक्या वर्षांचं हे सुंदर नातं संपवणं आमच्यासाठी सोप्पं नव्हतं. पण, सद्य:स्थिती पाहता ते गरजेचं होतं,’ असं दिव्यांशाने सांगितलं.
मालिकांच्या चित्रीकरणांचे व्यग्र वेळापत्रक आणि त्यामुळे एकमेकांना वेळ न देता आल्याने तुटलेली ही rv04पहिलीच जोडी नाही. ‘ये है महोबत्ते’ मालिकेतीलच अली गोनी आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांनीही आपली जोडी याच कारणाने तोडली होती. बिपाशा बासूसोबत ‘अलोन’ चित्रपटामध्ये चमकलेल्या करण सिंग ग्रोव्हर आणि बायको जेनिफर विंगेट हेही याच कारणाने वेगळे झाले. करण बॉलिवूडमध्ये त्याची जागा बनविण्यासाठी धडपडत होता. तर जेनिफर ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेमध्ये काम करत होती. त्यात करण आणि बिपाशामधील अफेअर्सच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगविल्या जात होत्या. दोघांच्या तुटलेल्या संवादात संशयाचे वादळही घोंघावू लागले होते. चित्रीकरण संपवून करण परतला तेव्हा जेनिफरला ‘फिर से’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला जावं लागलं आणि या दरम्यान त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. संवादाअभावी तुटलेल्या या नात्याची खंत करणने स्वत: ट्विटरवरून व्यक्त केली.
चित्रीकरणातून मिळणाऱ्या अपुऱ्या वेळेच्या कारणामुळे मालिकांमधील आणि प्रत्यक्ष आयुष्यातील हिट जोडी कृतिका काम्रा आणि करण कुंद्राचे नातेही तुटले होते. एकाच मालिकेत काम करत असताना त्यांच्यात सुत जुळलं. पण, मालिका संपल्यावर दोघंही वेगवेगळ्या मालिकांमध्ये गुंतले गेले आणि नात्यात दुरावा आला. rv05पण, नातं संपलं तरी एकमेकांचे मित्र म्हणून राहण्यास त्यांनी पसंती दिली. ‘बालिकावधू’मधील प्रत्युषा बॅनजीच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला तिचा प्रियकर मकरंद मल्होत्राचा पाठिंबा होता. पण, प्रत्युषा मालिकेच्या चित्रीकरणामध्ये अधिकच गुंतत गेली आणि मकरंदकडे तिचं दुर्लक्ष झालं. त्यात तिच्या संबंधांतील अफवांनी मकरंदला अस्वस्थ केलं. प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊन पोहचलं आणि दोघांनाही आपल्या नात्याचा शेवट करावा लागला.
प्रसिद्धी वलयात राहण्यासाठी कलाकारांना सतत धडपडावे लागतं हे जरी खरं असलं तरी जवळ्याच्या नात्यांमध्ये आलेला हा दुरावा त्यांनाही त्रासदायक असतो. आपल्या कामासाठी घर आणि कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्यात या प्रेमाच्या व्यक्तींचे महत्त्व जास्त असते. त्यामुळे कामाचा ताण, भरगच्च कार्यक्रम यांच्या गोंधळात जवळची माणसं दुरावत नाही आहेत ना याकडे लक्ष देण्याची गरज आता कलाकारांना आहे.

सावर ले..
एकमेकांच्या कामाचे वेळापत्रक सांभाळून नाती जपण्याकरता आपसातच समंजसपणा असणं गरजेचं असतं. पण, या काळात माध्यमांमध्ये कलाकारांच्या पडद्यामागच्या आयुष्याची, सहकलाकारांसोबतच्या मैत्रीची rv06चर्चा होत असते. या दुराव्याच्या क्षणांमध्ये त्या गोष्टींची कोणतीही शहानिशा न करता अनेक तर्कवितर्क दोघांकडूनही लावले जातात. टीव्हीवरील लाडकी बहू दृष्टी धामी आणि तिचा प्रियकर नीरज खेमका यांच्यातील गुण्यागोविंदाच्या प्रेमकहाणीलाही टीव्हीवरील याच प्रसिद्धी वलयाचा धक्का पोहचला होता. ‘मधुबाला’ मालिकेतील तिच्या rv07सोज्वळ भूमिकेमुळे घराघरांत पोहचलेली दृष्टी याच भूमिकेमुळे नीरजच्या घरातल्यांची लाडकी बनली. त्यामुळे पारंपरिक मारवाडी कुटुंबाकडून नीरजला लग्नाला पाठिंबा मिळाला. पण, ‘झलक दिखला जा’मधील दृष्टीचा बोल्ड अवतार आणि तिचा कोरियोग्राफर सलमान खानसोबत वाढती जवळीक त्यांच्या नजरेत खटकली. त्यांचं नातं कुटुंबामुळे तुटण्याच्या परिस्थितीत असतानाच ते दोघं एकत्र आले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दृष्टीनेही नवीन मालिका स्वीकारण्यापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकrv08णं पसंत केलं.

टीव्हीवरील ‘महादेव’ मोहित रैना आणि मौनी रॉयचे नातेही या अपुऱ्या वेळेचे शिकार ठरले होते. दोघंही या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आले. पण, मालिकेतील मौनीचा भाग संपल्यावर मात्र मोहित मालिकेत अधिकच गुंतत गेला आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. पण, त्या दोघांनीही नाते वेळीच सावरले.