बॉलिवूड आणि वादविवाद हे समीकरण नाकारता येत नाही. सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली टीका, चित्रपटांवरून झालेले वाद, सोशल मीडियावर ट्रोल अशा बऱ्याच घटना या सरत्या वर्षात घडल्या. या वर्षात सिनेसृष्टीत जेवढे वाद झाले तेवढेच वाद कलाकारांच्या खासगी आयुष्यातही झाले. काहींनी या वर्षी लग्न गाठ बांधली तर काहींनी अनेक वर्षांचे संसार मोडले. जाणून घेऊयात असे कोणते सेलिब्रिटी आहेत ज्यांनी एकत्र राहण्यापेक्षा यावर्षी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. सौंदर्य रजनीकांत आणि अश्विन- यंदाचे वर्ष सेलिब्रिटी जोडप्यांसाठी फारसे चांगले राहिलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे संसार यावर्षात मोडल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीचाही यात समावेश झाला आहे. रजनीकांत यांच्या मुलीच्या संसाराचा गाडाही कोलमडणार असल्याचे दिसते. रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्या हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे.सौंदर्या आणि अश्विन यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवल्यानंतर आता सौंदर्याने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. सौंदर्या आणि अश्विन २०१० मध्ये विवाबंधनात अडकले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर यांच्यात वाद सुरु झाले होते. शेवटी या दोघांनी आपआपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. नंदिता दास- अभिनेत्री नंदिता दास आणि तिचा पती सुबोध मस्कारा यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास सात वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर नंदिता आणि तिच्या पतीने विभक्त होण्याचा मार्ग निवडला आहे. त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा आहे. याबाबतीत लपविण्यासारखे आणि आणखी काही उघडपणे बोलण्यासारखे काहीच नाही.', असे नंदिता म्हणाली होती. 'विभक्त होणे ही काही सोपी बाब नाही. त्यातही तुम्हाला जर मूल असेल तर हा निर्णय आणखीनच कठीण होऊन बसतो. आम्ही आमच्या मुलालाच सर्वप्रथम प्राधान्य देणार आहोत' असे तिने स्पष्ट केले होते. विशाल दादलानी- बऱ्याच वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर संगीतकार विशाल दादलानीने घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. पत्नी प्रियाली कपूर आणि विशाल गेल्या काही काळापासून एकमेकांपासून वेगळे राहात होते. वीणा मलिक- अभिनेत्री वीणा मलिक सध्या चर्चेत आहे ती पती असद बशीर खान खट्टक याच्याशी घेतलेल्या घटस्फोटामुळे. वीणाने घटस्फोटासाठी स्वतः अर्ज दाखल केल्यामुळे यात तिचाच दोष आहे, असे वातावरण तयार झाले होते. मी पैशासाठी लग्न केले, असे लोकांना वाटते. असदकडचे पैसे संपल्यामुळे मी त्याला ‘तलाक’ देतेय, असे लोक सध्या म्हणतायेत. पण सत्य काही वेगळेच आहे. असदने मला अनेकदा मारहाण केली. शारीरिक व मानसिक छळ केला. यामुळे मी घटस्फोटाचे पाऊल उचलले, असे ती या व्हिडिओत म्हणते आहे. असरसोबत तीन वर्षांपूर्वी वीणा लग्नबंधनात अडकली होती. लाहोरमधल्या एका न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मंजूर करत तिच्या बाजूने निर्णय दिला आहे. घटस्फोटासाठी वीणानेच अर्ज दाखल केला होता. फरहान अख्तर- बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अधुना अख्तर यांचा याच वर्षी घटस्फोट झाला. १६ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी सामंजस्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये समुपदेशन केल्यानंतर त्यांना घटस्फोटाचा अर्ज मागे घेऊन एकत्र राहायचे आहे की नाही हे ठरवण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, सहा महिन्यांनंतरही हे दोघे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले होते. शाक्या आणि अकिरा या त्यांच्या दोन मुलींची जबाबदारी अधुनाकडे देण्यात आली असून, फरहानला त्यांना केव्हाही भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान आणि अधुनाने २००० साली लग्न केले होते. मात्र, फरहान आणि अधुनाच्या १६ वर्षांच्या संसारात वादाची ठिणगी नेमकी कोणत्या कारणामुळे पडली यामागचे मूळ कारण आजतागायत समोर आलेले नाही. अरबाज खान- मलायका अरोरा- बॉलिवूडमधील सर्वात गाजलेले घटस्फोटाचे प्रकरण म्हणजे अरबाज आणि मलायका अरोरा यांचा. याच वर्षी मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जास कायदेशीर मंजुरी दिली. न्यायालयाच्या या निर्णयाने त्याचं १८ वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आले. हिमेश रेशमिया- संगीतकार, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियाचा २२ वर्षांचा संसार अखेर मोडला. मुंबई हायकोर्टाने हिमेश आणि त्याची पत्नी कोमल यांना घटस्फोट मंजूर केला. 'आम्ही घटस्फोट घेतला असला तरी आम्ही एकमेकांचा नितांत आदर करतो, तसेच परस्पर संमतीनेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही वेगळे झालो असलो तरी ती रेशमिया कुटुंबाची कायमच सदस्य राहील आणि मी कोमलच्या कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग राहीन,' असे हिमेशने सांगितले. हिमेश आणि कोमल गेली २२ वर्ष एकमेकांसोबत संसार करत होते. पण अचानक या दोघांना आपण एकमेकांना अनुरुप नसल्याचे लक्षात आले आणि त्यांनी काडीमोड घेतला. या दोघांना स्वयम नावाचा मुलगा आहे. हिमेशच्या घटस्फोटाचे मुख्य कारण टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून हिमेशचे सोनियाशी नाव जोडले जातेय. २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिली चार वर्षे हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख फक्त एक ‘चांगली मैत्रीण’अशीच करुन दिली होती. पण, या दोघांची वाढती सलगी मीडियापासून काही लपून राहिली नाही. कुटुंबीयांच्या विरोधामुळे मग काही काळासाठी दोघांनी एकमेकांपासून अंतर राखून ठेवले. परंतु हिमेशच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलला म्हणजेच हिमेशच्या पत्नीला याची पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही. करिष्मा कपूर, संजय कपूर- अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही वर्षांपासून अस्थैर्य पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नात्यात आलेल्या दुराव्यामुळे करिष्मा आणि तिचा पती संजय कपूर या दोघांनीही त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नात्याच्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर करिष्मा आणि संजय या दोघांचीही नावं कोणा दुसऱ्याच व्यक्तींसोबत जोडली गेली. संजय कपूरने त्याच्या प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकत नव्या प्रवासाला सुरुवातही केली.तर करिष्मासुद्धा तिच्या कथित प्रियकरासोबत म्हणजेच संदीप तोष्णीवालसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. जुही परमार- सचिन श्रॉफ- टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांनी आठ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर ते आता घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या एक वर्षापासून हे दोघं वेगळे राहत असून, त्यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची काहीच चिन्हं नाहीत. या दोघांना समायरा ही मुलगी आहे. जुहीने सचिनचे घर सोडल्यापासून मुलगी तिच्याचकडे राहतेय.काही वर्षांपूर्वीच या दोघांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आमचा संसार खूप सुखात सुरु असल्याचे त्यांनी तेव्हा म्हटले होते. किरण करमरकर- अभिनेता किरण करमरकर आणि अभिनेत्री रिंकू धवन हे १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वेगळे होणार असल्याचे म्हटले जात आहे. किरण आणि रिंकूला कसे वागावे याची योग्य समज आहे. त्यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, त्यावर कोणताच उपाय दिसत नाही. त्यामुळे मनात एकमेकांबद्दल कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा विभक्त होण्याचा मार्ग त्यांना योग्य वाटतो.या दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला असून, त्यांना आता केवळ त्यांच्या लहान मुलाची चिंता आहे. एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. या मालिकेत त्यांनी भावंडांची भूमिका साकारली होती. त्यावेळी दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी २००२ मध्ये विवाह केला.