गेल्यावर्षी २०१६च्या अखेरीस एक सोडून चार-चार अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्या. त्यानंतर २०१७ ला सुरुवात झाली अन् हे वर्षही हा हा म्हणता आता काही दिवसांमध्ये संपेल. यंदाच्या वर्षात चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतात फार काही मोठ्या घडामोडी पाहावयास मिळाल्या नाहीत. पण, गेल्या दोन महिन्यात अनेक मराठी कलाकारांना त्यांचा आयुष्याचा जोडीदार मिळाल्याचे पाहायला मिळाले. कुणी लव्ह मॅरेज तर कोणी घरच्यांच्या पसंतीने लग्न केले. कुणी अगदी थाटामाटात डेस्टिनेशन वेडिंग तर कुणी अगदी साधेपणाने वैदिक पद्धतीने लग्न करण्यास प्राधान्य दिले. या वर्षभरात कोणकोणत्या मराठी सेलिब्रिटींच्या घरी सनई-चौघडे वाजले त्यावर एक नजर टाकूया.

मनवा नाईक-सुशांत तुंगारे
याचवर्षी मार्च महिन्यात अभिनेत्री मनवाने निर्माता सुशांत तुंगारे याच्याशी विवाह केला. चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय करणाऱ्या मनवाने आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले असून, तिने सुशांतसह ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेची निर्मिती केली होती. ‘सरस्वती’ या मालिकेची निर्मितीदेखील सुशांत तुंगारे याचीच आहे.

अक्षया गुरव-भूषण वाणी
‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अक्षया गुरवने सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी याच्याशी २३ मे २०१७ला लग्न केले. एका मित्राच्या माध्यमातून अक्षया आणि भूषणची ओळख झाली होती. अक्षया आणि भूषणचं ‘लव्ह मॅरेज’ आहे. पण, प्रेम आणि त्यातही एकाच इंडस्ट्रीतील मुलासोबत प्रेम हा विषय ज्यावेळी अक्षयाच्या घरच्यांना कळला तेव्हा त्यांनी सुरुवातीला काही प्रश्न उपस्थित केले. अर्थात ते प्रश्न पडणं स्वाभाविक होतं. पण, भूषणला भेटताच अक्षयाच्या कुटुंबीयांच्या सर्व शंका दूर झाल्या. असंच काहीसं भूषणसोबतही घडलं. पण, अक्षया- भूषणच्या नात्याला त्या दोघांच्याही कुटुंबीयांनी लगेचच पसंती दिली.

अमेय वाघ-साजिरी देशपांडे
गेल्या १३ वर्षांपासून साजिरी देशपांडेला डेट करणारा अमेय सरतेशेवटी २ जुलैला विवाहबंधनात अडकला. पुण्यातील श्रुतिमंगल कार्यालयात अमेय आणि साजिरीचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली. दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, सुमित राघवन, ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी यांच्यासोबतच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेची संपूर्ण टीम लग्नाला उपस्थित होती.

प्रल्हाद कुडतरकर-अंजली कानडे
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनातं घर करणाऱ्या पांडू अर्थात लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकरने मे महिन्यात अंजली कानडे हिच्याशी लग्न केले. अंजली योग प्रशिक्षक आहे.

प्रार्थना बेहरे-अभिषेक जावकर
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकली. निर्माता, दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत प्रार्थनाने संसार थाटला. गोव्यात झालेल्या प्रार्थना – अभिषेकच्या डेस्टिनेशन वेडिंगची बरीच चर्चा मनोरंजन विश्वात रंगली होती. अनेक कलाकार मंडळींनी या लग्नात कल्ला केल्याचे पाहायला मिळाले. प्रार्थनाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार राहिलेल्या कलाकार मंडळींनी या लग्नसोहळ्यातील काही फोटो इन्स्टाग्राम, फेसबुकवर शेअर केले होते. तसेच, स्वतः प्रार्थनानेदेखील नवनवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत होती.

पूजा पुरंदरे-विजय अंदलकर
अभिनेत्री पूजा पुरंदरे आणि अभिनेता विजय अंदलकर यांनी २३ नोव्हेंबरला लग्न केले. पूजा-विजयचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता. प्रार्थना बेहरेच्या लग्न समारंभातही हे एकत्र दिसले होते. यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत विजयने पूजासह मोठ्या थाटात पारंपरिक पद्धतीने विवाह केला. विजयने ‘ढोल ताशे’, ‘मी अॅण्ड मिसेस सदाचारी’, ‘७०२ दीक्षित’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर पूजाने ‘किती सांगायचंय मला’ या मराठी मालिकेत काम केले आहे.

रोहन गुजर-स्नेहल देशमुख
‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेत राजाच्या भूमिकेत असलेला रोहन गुजर आणि त्याची मैत्रीण स्नेहल देशमुख यांनी मात्र हटके पद्धतीने लग्न केलं. साईबाबांचं मंदिर, भटजीबुवा, दोघांचे आईबाबा, सख्खी भावंडं अशा फक्त १५ वऱ्हाडींच्या साक्षीने रोहन आणि स्नेहल यांनी सहजीवनाच्या प्रवासाला सुरूवात केली. ‘होणार सून मी या घरची’, ‘बन मस्का’ आणि आता ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेत रोहन गुजर याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण याच रोहनने १५ वर्षापूर्वी मैत्रीण स्नेहल हिचे मन जिंकले. रोहनला डामडौल करत लग्न करायचं नव्हतं. लग्नातला खर्च टाळण्यासाठी नव्हे तर लग्नासारखा आपल्या आयुष्यातील खास सोहळा कुटुंबीयांच्या सानिध्यात व्हावा यासाठी रोहनने अगदी साध्या पद्धतीने २१ नोव्हेंबरला लग्न केले.