छोट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा सत्तेत यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षांत प्रशंसनीय काम केलं असून त्यांनी पुन्हा एकदा सत्तेत यावं असं तिने म्हटलंय. यासोबतच मी देखील चौकीदार आहे आणि आपण सर्वांनीही आपल्या घराचे, राज्याचे, देशाचे चौकीदार व्हायला हवं असं मत शुभांगीने व्यक्त केलं. ही सर्व माझी वैयक्तिक मतं असून देशाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, असंही ती पुढे म्हणाली. शुभांगीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही मतं मांडली. त्याचसोबत सोशल मीडियावरून तिला आलेल्या अश्लील प्रतिक्रियांबाबतही ती मुलाखतीत मोकळेपणाने बोलली. 'अशा प्रतिक्रिया वाचून मी निराश होते पण त्यांचा मला फार फरक पडत नाही,' असं ती म्हणाली. या मालिकेत 'तिवारीजी' ही भूमिका साकारणाऱ्या रोहितने मोदी सरकारकडून घेण्यात आलेले निर्णय लोकहिताचे असल्याचं म्हटलं. 'देशात आता काळा पैसा राहिलेला नाही. पूर्वी रिअल इस्टेट उद्योगात फसवणूक होत होती. परंतु आता असे उद्योग अस्तित्वात नाहीत,' अशी प्रतिक्रिया त्याने दिली. तर मलखनची भूमिका साकारणाऱ्या दिपेश भानने मतदान हा आपला सर्वात मोठा हक्क असून आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असं आवाहन लोकांना केलं आहे. 'टीका' भूमिका साकारणारा अभिनेता वैभव माथूरनेही लोकांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे असून मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्याचे सांगितले आहे.