निर्सगानं मुक्तपणे सौंदर्याची उधळण केलेल्या केरळवर वरुणराजाची अवकृपा झाली आहे. गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत १६४ बळी गेले आहेत. राज्यातल्या १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. लाखो लोक बेघर झालेत, हजारो लोकांची घर वाहून गेली आहेत. मदत छावण्यांमध्ये आतापर्यंत १.५ लाख विस्थापित आणि बेघरांनी आश्रय घेतला आहे. देशभरातून केरळवासीयांना मदत करण्याचं आवाहन सगळेच जण करत आहेत, अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन केलं आहे. काही कलाकार स्वत: रस्त्यावर उतरून मदतीसाठी पुढे येत आहेत. अशा वेळी केरळचा प्रसिद्ध अभिनेता तोव्हीनो थॉमस यांनं स्वत:चं घर पुरग्रस्तांनी खुलं केलं आहे.

त्रिसूरमध्ये थॉमसचं घर आहे. हा भाग पाण्याखाली गेला आहे. पण थॉमसच्या घराला पुराचा तितका तडाखा बसला नाही. त्यामुळे त्यानं आपलं घर पुरग्रस्तांसाठी खुलं केलं आहे. सध्या घरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे लोक तिथे आसरा घेऊ शकतात असं त्यांनी सांगितलं आहे. पुरग्रस्तांसाठी त्यानं काही सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत इथेच विश्रांती घेण्याची विनंती त्यांनी लोकांना केली आहे.

थॉमसप्रमाणे कमल हसन, सूर्या, विजय यासांरख्या कलाकारांनी प्रत्येकी २५ लाखांची मदत पुरग्रस्तांसाठी दिली आहे. पावसाच्या हाहाकारामुळे आत्तापर्यंत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान तसेच जीवितहानी आणखी वाढण्याची भीती आहे. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच ३९ धरणांपैकी ३५ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले होते.