बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील सर्वच गाण्यांना प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटातील आरिजीत सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या आवाजातील ‘जालिमा..’ या गाण्यामध्ये शाहरुख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हे रोमान्स करताना दिसले होते. माहिरा-शाहरुखच्या या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या गाण्याची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की, या गाण्याने तरुणाईला तर थिरकायला लावलेच पण तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला नव्या दमाचा पार्श्वगायक अभिजीत सावंतलाही हे गाणे चांगलेच भावले आहे. अभिजीतने स्वत:च्या आवाजात गाण्याला सूर देत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. इंडियन आयडॉलच्या व्यासपीठावरुन आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिजीतने ‘जालिमा..’ हे गाणे नुसतेच गायले नाही तर त्याच्यावर हेच गाणे चित्रीत देखील करण्यात आले आहे. शाहरुखच्या अभिनयातील या गाण्यावर अभिजीतची झलक देखील कमालीची दिसत आहे. शाहरुखच्या गाण्याप्रमाणेच त्याच्या गाण्याला देखील चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसते.

बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ‘ओ जालिमा..’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर  ज्यांना गाण्याची आवड नसेल त्यांना देखील ‘जालिमा..’ हे गाणे गुणगुणायला लावेल, असा विश्वास शाहरुखने  व्यक्त केला होता. अभिजीतने या गाण्याला आवाज देत वेगळ्या अंदाजात सादर केल्यामुळे शाहरुखच्या गाण्याची छाप या नव्या पार्श्वगायकावर पडलेली दिसते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बॉक्स ऑफिसवर त्याचा चित्रपट ज्याप्रमाणे कमाई करत आहे अगदी त्याप्रमाणेच त्याच्या या गाण्याची देखील तरुणाईमध्ये क्रेझ दिसून येते. ‘रईस’च्या प्रमोशनावेळी शाहरुख बऱ्याचदा या गाण्यावर थिरकताना दिसला होता. पुण्यामध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी गेलेल्या शाहरुखने तेथील एका कॉलेजमध्ये त्याच्या चाहत्यांसोबत ‘जालिमा’ या गाण्यावर नृत्य सादर केल्याचेही पाहावयास मिळाले होते. अभिजीतच्या ‘जालिमा..’ या गाण्याला दोन दिवसांमध्ये १२ लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे.

अभिजीत सावंत विषयी बोलायचे तर  इंडियन आयडॉलच्या पहिल्या सिझनमध्ये भारतीय संगीत क्षेत्राला एक नव्या दमाचा पार्श्वगायक मिळाला होता. अभिजीतच्या गाण्याला तरुणाईमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये यश मिळविल्यानंतर अभिजीतने गायलेले ‘मोहबत्ते लुटाउंगा..’ हे गाणे आजही तरुणाई गुणगुणताना दिसते. अर्थातच अभिजीतने आपल्या गायनाने तरुणाईमध्ये वेगळी छाप पाडल्याचे नाकारता येणार नाही. अभिजीतने ‘रईस’ चित्रपटातील ‘जालिमा..’ हे गाणे  पुन्हा नव्या ट्रकवर आणल्यानंतर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘जालिमा..’ गाणे सध्याच्या घडीला धुडकूस करताना दिसत आहे.