“मॅड झालस काय, व्हतला व्हतला सगळा व्हतला आणि मी कधी कुणाक काय सांगतंय काय”, हे संवाद अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या जिभेवर रुळू लागले होते. ही पात्र रोजच्या जगण्याचा भाग झाली होती. कोकणच्या निसर्ग सौंदर्यात चित्रित झालेल्या गाव गाता गाजली या मालिकेने अगदी थोड्याच काळात लोकांची मनं जिंकली. मनोरंजनासोबतच डोळ्यात अंजन घालणारी ही मालिका आता तात्पुरता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. पण अल्पावधीतच संदीप, वामन्या, आबा, क्रिश ही पात्र नव्याने आपल्या भेटीस येणार आहेत. या मालिकेच्या जागी जागो मोहन प्यारे ही मालिका तुम्हाला पाहता येणार आहे बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘हंड्रेज डेज’ या मालिकेचे निर्माता संतोष कणेकर यांनीच ‘गाव गाता गजाली’ची निर्मिती केली आहे. तर या गजाली लिहिण्याची आणि अभिनयातून पोहोचवण्याची दुहेरी जबाबदारी या मालिकेतही प्रल्हाद कुडतरकर पेलताना दिसणार आहे, दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. कोकणी माणसांचा स्वभाव मुळातच गप्पिष्ट. चार मंडळी जमवून गप्पा छाटत बसणे हा कोकणी माणसांचा आवडता उद्योग. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या मालवणी भाषेत या गप्पांनाच ‘गजाली’ असे म्हटले जाते. या गप्पांमध्ये गावातील भानगडी ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळे विषय असतात. मालवणातील गजालीची धम्माल या मालिकेतून पाहायला मिळते. प्रसिद्ध विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, भरत सावले, किशोर रावराणे आणि इतर कलाकारांच्या साथीने 'गाव गाता गजाली' प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. कोणत्याही भूमिकेला उगाचच न रंगवता सहजपणे होणारे शाब्दीक विनोद, सर्वसामान्य गावकऱ्यांच्या चर्चा, त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग या सर्व गोष्टींवर या मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे.