विविध विषय हाताळत आणि त्या विषयांना कलाकारांच्या अभिनयाची साथ देत मालिका विश्वाच्या कक्षा रुंदावत आहेत. हिंदी मालिकांचं वाढतं प्रस्थ लक्षात घेत त्याच तोडीच्या काही मराठी मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यापैकीच एक मालिका म्हणजे 'लागिरं झालं जी'. नेहमीच्या सासू सुनांचा ड्रामा आणि प्रेम या संकल्पनांना शह देत या मालिकेतून एका वेगळ्या कथानकावर भाष्य करण्यात येतंय. अर्थात प्रेम या मालिकेचा एक भाग असला तरीही त्याची पार्श्वभूमी जरा वेगळी आहे. सध्याच्या घडीला या मालिकेने बऱ्याच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या मालिकेच्या नवीन भागात 'कारगिल विजय दिवस' साजा केला जाणार आहे. २६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच धर्तीवर भारतीय सैन्यदलात सामिल होऊन देशसेवा करण्याची ओढ असलेल्या तीन तरुणांची गोष्ट ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत दाखवण्यात येतेय. त्यामुळे 'कारगिल विजय दिवसा'च्या निमित्ताने आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना या मालिकेतून मानवंदना देण्यात येणार आहे. सैन्यदल, जवान, देशाप्रती असणारं प्रेम आणि देशसेवेची ओढ हे या मालिकेच्या कथानकातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या खास दिवसाचं महत्त्व जाणत मालिकेतून शूरवीरांना सलाम केला जाणार आहे. या मालिकेच्या कथानकानुसार हणमंत फौजी यांनी कारगिल युद्धामध्ये लढताना हात गमावल्याने इंफन्ट्रीकडून कारगिल विजय दिवशी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. हणमंत त्यांच्यासोबत अजिंक्यलाही घेऊन जातात. ट्रेनिंग सेंटरचं वातावरण पाहून अजिंक्य भारावून जातो. कारगिलमध्ये शहिद झालेल्या जवानांना यावेळी आदरांजली वाहिली जाते. तेव्हा आता 'अज्या' म्हणजेच अजिंक्यचा हा अनुभव कसा असेल हे प्रेक्षकांना पाहता येणार आहे.