स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. वाढदिवशीच अरुंधती अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस देणार आहे. अरुंधतीच्या या निर्णयामुळे अनिरुद्धच्या अहंकाराला धक्का बसणार हे नक्की. खरंतर अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वयंपूर्ण झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरलं. आता मात्र नको असलेल्या बंधनातून मुक्त व्हायचं अरुंधतीने ठरवलं आहे. त्यामुळेच अनिरुद्धला घटस्फोट देण्याचा मोठा निर्णय तिने घेतला आहे.

मालिकेतल्या या निर्णायक वळणाबद्दल सांगताना अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाल्या, “एकेकाळी अनिरुद्धवर मनापासून प्रेम केल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेणं अरुंधतीसाठी सोपी गोष्ट नाही. या परिस्थितीचा सामना खूप धाडसाने आणि धैर्याने करायचं तिने ठरवलं आहे. आई कुठे काय करते मालिकेतून स्थिर असा स्त्रीवाद दाखवण्यात येत आहे. कुठेही आरडाओरडा नाही, स्त्रीमुक्ती चळवळीच्या घोषणा नाहीत, आक्रस्ताळेपणा नाही. अरुंधती अत्यंत ठामपणे आणि सत्सकविवेकबुद्धीला स्मरुन शांतपणे निर्णय घेते हे तिच्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण आहे. या सगळ्यात घरातल्या जबाबदाऱ्या न नाकारता इतर कोणतीही नाती न विस्कटू देता ती तिच्या न्यायासाठी लढते आहे.”

आजवर अरुंधतीचं खंबीर रुप प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामुळे अरुंधतीचा पुढचा प्रवास कसा असणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.