छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. या मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेचा ५०० वा भाग नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या निमित्ताने अभिषेक देशमुख याने इन्स्टाग्राम लाईव्ह करत मालिकेतील प्रमुख कलाकारांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले होते. त्यावेळी आईची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने हा संपूर्ण प्रवास आठवताना माझ्या अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया दिली.

मधुराणी गोखले प्रभुलकर नेमकं काय म्हणाली?

“खरंतर तुमच्या प्रेक्षकांच्या उदंड प्रेमामुळेच इथपर्यंत पोहोचलो. आज मागे वळून बघताना सर्व प्रवास डोळ्यासमोरून गेला. मला आलेला पहिला फोन, त्यात मालिकेसाठी झालेली विचारणा तेव्हापासून आतापर्यंत हा प्रवास मागे वळून बघताना डोळ्यासमोर उभा राहतो. हे सर्व सुरु असताना मला खरंच वाटले नव्हते की हे सुरु करताना हा असा एवढा थ्रीलिंग प्रवास असणार आहे. यातून आपल्याला इतके काही तरी मिळणार आहे. मी गेल्या अनेक वर्ष मालिकेत काम केले नव्हते आणि इतकी चांगली भूमिका आहे म्हणून मी ती स्विकारली. पण ती इतकी घराघरात पोहोचेल, लोकांचं इतकं प्रेम मिळेल असे अजिबात वाटलं नव्हतं. या मालिकेचे ५०० भाग करु शकू असेही वाटलं नव्हते,” असे ती म्हणाली.

“एखादी मालिका सुरु झाल्यानंतर तिचा प्रवास कसा असणार, काय असणार हे माहिती नसते. हा संपूर्ण प्रवास अरुंधतीसाठी चढ-उतारांचा होता. अरुंधतीने मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं आणि मालिकेतील खूप दृष्य आहेत जी माझ्या आजही स्मरणात आहेत. माझ्या वाटेला मालिकेतील ती दृष्य आली, याचा मला आनंद वाटतो. सुरुवातीला माझे आणि सासूबाईंचे नाते हे वेगळे होते. अभिषेकच्या साखरपुड्याच्या आदल्या दिवशी सासूबाईंच्या पायला तेल लावतानाचा तो सीन मी कधीच विसरु शकत नाही. नवऱ्याचे अफेअर कळल्यानंतर शूट केलेले सर्वच सीन माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. मला फार मज्जा आली,” असेही तिने सांगितले.

“हा संपूर्ण प्रवास आठवताना माझ्या अंगावर काटा येतो. मला अशी भूमिका करायला मिळाली, यानिमित्ताने देवाचे आभार मानावे वाटतात. अनेकदा भांडणही होतात. पण दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकत्र येतो,” असेही ती गमतीत म्हणाली.

‘हा आहे अरुंधतीचा नवा लूक?’, जाणून घ्या फोटोमागील सत्य

सध्या आई कुठे काय करते मालिका एका वेगळ्या वळणावर असल्याचे पाहायला मिळते. अरुंधतीने तिच्या नावावर असलेले घर गहाण ठेवले आहे. तर अनिरुद्ध घर हे बिल्डरला देऊन फ्लॅटमध्ये राहायचे असे अप्पा आणि आईला सांगतो. त्यामुळे आता अरुंधती हे घर विकू देणार की नाही? हे आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे.