मृत्यूची भीती कोणाला वाटत नाही. आपल्यामागे आपल्या कुटुंबाचे काय होणार असा सर्वसाधारण प्रश्न प्रत्येकाला कधीनाकधी पडतोच. अशीच काहीशी चिंता बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान यालाही पडली आहे.
आमिरसाठी त्याचे कुटुंब किती महत्त्वाचे आहे हे वेगळे काही सांगायला नको. पण चित्रपटसृष्टी हेसुद्धा त्याचे कुटुंबच आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटामागे असलेली त्याची कठोर मेहनत आणि परफेक्शन त्याचे चित्रपट पाहताना दिसून येते. आमिरच्या आगामी दंगल चित्रपटाचे काम सध्या चालू आहे. अगदी छोट्या गोष्टींचाही स्वतःला ताण करून घेण्याची त्याला सवय आहे. दरम्यान, एखाद्या चित्रपटाचे काम सुरु असताना जर त्याला काही दुखापत झाली किंवा मरण आले तर काय होणार? असा प्रश्न पडलेल्या आमिरने आता त्याच्या मरणानंतर काय करायचे याबाबत लिहण्यास सुरुवात केलीयं.
दंगलचा दिग्दर्शक नितेश तिवारी याच्यासाठीही आमिरने काही लिहून ठेवले आहे. यात आमिरने म्हटलेय की, मला काही झाले तरी सर्वकाही तसेच राहिल. फक्त तरुणपणातील महावीरच्या भूमिकेकरिता नव्या कलाकाराला घेण्याची गरज लागेल आणि तुझा चित्रपट पूर्ण होईल. याचसोबत आमिरने सदर भूमिकेसाठी काही कलाकारांची नावे सुचवली आहेत. या नावांमध्ये वरुण धवन, शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचा समावेश आहे.